नांदेड – मराठवाड्यातील जुनाट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळ,यामुळे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, रोजगारासाठी परप्रांतामध्ये स्थलांतरितांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेली वाचनाची गोडी आदी समस्यांवर मराठवाड्यातीलच कवींच्या कवितांच्या, साहित्याच्या माध्यमातून विचारमंथन व्हावे, या कवींचा एथोचित सन्मान करता यावा, त्यांची प्रेरणा घेऊन मराठवाड्यात नवकवी, लेखक निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि या कवींच्या विचारमंथनातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी या उदात्त हेतूने राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा ता. लोहा जि. नांदेड या संस्थेच्या वतीने सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय कवी संमेलन आणि मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले यांनी दिली.

या मराठवाडास्तरीय भव्य कवी संमेलनाचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण असून स्वागताध्यक्ष राजेश पवाडे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य आणि जेष्ठ साहित्यिक देविदास फुलारी तर निमंत्रक म्हणून मनपा नांदेड चे माजी नगरसेवक आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांची उपस्थिती राहणार आहे. हे कवी संमेलन रविवार २९ जून रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मराठवाडास्तरीय भव्य कवी संमेलनासाठी कवी, लेखक, साहित्यिक, विद्यार्थी, महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!