हदगाव (प्रतिनिधी) – रस्त्यात विटा व रेती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना हदगाव तालुक्यातील रावणगाव येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शंकर पावडे, शिवाजी शंकर पावडे, नितेश संभाजी पावडे, ओमकार प्रकाश पावडे, देविदास खंडूजी पावडे, नागोराव खंडूजी पावडे, वेदांत नागोराव पावडे आणि नारायण तानाजी पावडे (सर्व रा. रावणगाव, ता. हदगाव) यांनी रस्त्यात विटा व रेती टाकल्याच्या कारणावरून फिर्यादी अर्जुन ईराजी पावडे (वय ३०) यांच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांच्या भावास मारहाण केली. तसेच अर्जुन पावडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अर्जुन पावडे यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि खेडकर करीत आहेत.
