नांदेडमध्ये भारत बंदला मोठा प्रतिसाद; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेनंतर शहरात भव्य मोर्चा

आजच्या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा होता

नांदेड (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला नांदेड शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधील वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी जनतेने एकत्र येत हा बंद पाळला आणि आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

भव्य मोर्चा आणि जनसहभाग शहरातील महात्मा फुले पुतळा, हैदराबाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे यात तरुण-तरुणींसह महिला आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील शिवाजीनगर ते वर्कशॉप परिसरातील दुकाने सकाळपासूनच बंद होती, तर दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोर्चा निघाल्यानंतर उर्वरित बाजारपेठही पूर्णपणे बंद करण्यात आली.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ बाचाबाची आंदोलन सुरू असताना एका ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी आपल्या गणवेशावरील नावाची पाटी (नेमप्लेट) आणि बक्कल नंबर काढून खिशात ठेवल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आले. दिल्लीत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संतप्त युवकांनी पोलिसांना याचा जाब विचारल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण होऊन बाचाबाची झाली. मात्र, उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मध्यस्थी करणाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद थोडक्यात निवळला.

जिल्ह्याभरात शांततेत बंद प्राप्त माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीला ब्रोन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला होता. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता अशाच प्रकारे देशभर उमटताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!