नांदेड (प्रतिनिधी)- परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी भ्रष्ट आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेली मोहीम आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यांच्या या कडक कारवाईमुळे परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. उमाप यांनी केवळ इशारा देऊन न थांबता, थेट कृती करून हे दाखवून दिले आहे की, कायद्याचे रक्षक जर भक्षक बनले तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची थेट नांदेड जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आलेली बदली, हे याच आयर्न फिस्ट कारवाईचे ताजे उदाहरण आहे. त्यांच्यासोबतच शाखेतील ८ ते १० पोलीस अंमलदारांनाही तडकाफडकी मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध धंदे चालणार नाहीत असा सज्जड दम शहाजी उमाप यांनी वेळोवेळी दिला होता, मात्र तरीही काही अधिकारी आपल्या जुन्या खोडी सोडायला तयार नव्हते. मोदकांचा प्रसाद घेण्याच्या नादात वर्दीच्या कर्तव्याचा विसर पडलेल्या या अधिकाऱ्यांना आता मोठा दणका बसला आहे. येथे एक म्हण तंतोतंत लागू पडते, ती म्हणजे मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते आणि तिला वाटते की आपल्याला कोणीच पाहत नाही. सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही असेच वाटले असेल की आपले कारनामे कोणाच्या लक्षात येणार नाहीत. पण शहाजी उमाप यांची नजर तीक्ष्ण आहे, त्यांना सर्व काही दिसत आहे. आतापर्यंत केवळ पोलीस हवालदारांवर कारवाई होत होती, पण आता थेट स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रमुखालाच धारेवर धरल्यामुळे संपूर्ण परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड धडकी भरली आहे. ज्यांनी कायद्याच्या रक्षणासाठी वर्दी परिधान केली आहे, त्यांनी चुकीच्या कामांत रस दाखवू नये, हाच स्पष्ट संदेश यातून मिळतो. अति तिथे माती या म्हणीप्रमाणे, भ्रष्टाचाराचा अतिरेक शेवटी नडला आणि सरोदे यांच्यावर ही नामुष्की ओढवली. शहाजी उमाप यांचा हा लोखंडी हात आता गुन्हेगारांसोबतच भ्रष्ट वर्दीधाऱ्यांचेही कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, हे आता निश्चित झाले आहे परभणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे .. Kanthak Suryatal Post Views: 1,549 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माता गुजरीजी उद्यान येथे वृक्षारोप अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाज; लहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलन सेवा सुरू करण्याची मागणी