नांदेडमध्ये शिक्षण सेवकांच्या कॅण्डल मार्चने वेधले लक्ष;निधन झालेल्या शिक्षण सेवकांना वाहिली श्रध्दांजली

नांदेड (प्रतिनिधी) –  शिक्षण सेवक म्हणून रूजू असताना अकाली निधन झालेल्या राज्यातील शिक्षण सेवकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी, शिक्षण सेवकांच्या न्याय हक्कांसाठी व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी  नांदेडमध्ये शिक्षण सेवक कृती समिती, नांदेडच्यावतीने महात्मा फुले चौकात कॅण्डल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सर्व शिक्षकांनी अभिवादन केले.

नियमित शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना सेवा कालावधीत कोणतीही सुरक्षा मिळत नाही. शिक्षण सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते व मयतांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो, ही मोठी शोकांतिका आहे. शिक्षण सेवक कालावधीत शिक्षकांना अल्प मानधनावर सेवा करावी लागते. मयतांच्या वारसांना नोकरी देत आर्थिक लाभ द्यावे. शिक्षण सेवकांना सर्व प्रकारचे सेवा संरक्षण लागू करावे अशा शिक्षण सेवकांच्या मागण्या आहेत. तसेच शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्याची मागणी अनेक शिक्षक संघटनांनी आजपर्यंत केली आहे. न्यायालयात सध्या दाखल असलेल्या शिक्षण सेवक रद्द याचीकेबद्दल सरकार आपली भूमिका स्पष्ठ मांडत नसून वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण सेवकांच्या प्रश्नांबाबत शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने शिक्षण सेवकांचा सहानुभूतीपूर्वक  विचार करून  न्याय द्यावा अशी मागणी कॅण्डल मार्च नंतर झालेल्या आदरांजली सभेत शिक्षण सेवक कृती समिती नांदेडच्यावतीने करण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी शिक्षण सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. शिक्षण सेवकाचे निधन झाल्यास शासनाकढून कुटुंबियांना कोणतेही संरक्षण मिळत नाही. आपल्या मागण्या पदरात पडून घेण्यासाठी सर्व शिक्षण सेवकांनी एकत्र यावे व शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यासाठी व्यापक लढा उभारावा असे सांगितले. प्रा. आकाश करंडे आपल्या मनोगतात म्हणाले की मुळात २०२३  मध्ये टेटची परीक्षा झाल्यानंतर जी भरती प्रक्रिया २०२३  मध्येच होण्याची अपेक्षा होती त्या भरती प्रक्रियेला २०२४ आणि २०२५  उजाडला जवळपास यामध्येच शिक्षण सेवकांचे दोन वर्ष वयाची वाढत गेली यामध्ये सरासरी लागलेल्या शिक्षण सेवकांचे वय हे ३३-३५ वर्ष असून त्यांना अजून तीन वर्ष तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे त्याचबरोबर त्यांना इतर सुविधा सुद्धा नाहीत, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये नोबेल व्यवसाय असलेल्या शिक्षकांवर ही पाळी येणं हे फार मोठे दुर्दैव आहे.

कॅण्डल मार्च मध्ये प्रा डॉ. विनोद चव्हाण, प्रा. आकाश करंडे, प्रा. लक्ष्मण कोकाटे, प्रा. डॉ. गजानन ढोणे, प्रा. हनुमंत इंगळे, प्रा. तिरुपती पाटील, प्रा. प्रदीप जाधव, प्रा. अक्षय वडजे, प्रा. जयंत जोशी, प्रा. आदिनाथ पायघन, प्रा. आदित्य गोडबोले, प्रा. शिवलिंग चोंडे, प्रा. किरण बिचकुंदे, प्रा. बापू खुरंगे, प्रा. अंकिता वडजे, प्रा. प्रतीक्षा सुर्वे, प्रा नेहा बोरकर, प्रा. राहुल टिचुकले, प्रा. कैलास पाटील, प्रा. गजानन चौधरी, मधुकर शेवाळे, लक्ष्मीकांत पोगुलवाड, दिनेश चाटसे, महेश श्रीरामे, राहुल पवाडे, गिड्डेअण्णा धोत्रे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील नवनियुक्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!