∆ सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांनी अजगर पकडून दिले वन विभागाच्या ताब्यात !
मुखेड( प्रतिनिधी)–मुखेड तालुक्यातील बिल्लाळी शिवारात दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी शेतकऱ्यांना शेतीत अजगर आढळून येताचं एकच भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात येवती येथील माजी उपसरपंच तथा एक कुशल सर्पमित्र बालाजी तानाजी नागरगोजे यांना बिल्लाळी येथील योगेश पुंडलिकराव कदम यांचा फोन आला व बिल्लाळी येथील राजेश भाऊराव कदम यांच्या पंपईच्या शेतात एक भला मोठा अजगर असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांनी कसलीच जिवाची पर्वा न करता तात्काळ त्यांनी बिल्लाळी शिवारात धाव घेतली व मोठ्या कौशल्याने आठ फुट लांबीचा व साडेसहा किलोचा अजगर पकडला.पकडलेला अजगर पाहण्यासाठी काही काळ शेतीवर मोठ्या प्रमाणावर एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.नंतर पकडलेला अजगर एका सुती पोत्यामध्ये सुरक्षित घालून ते येवती येथील बस स्टॅन्डला आणण्यात आले. व तात्काळ मुखेड वन विभागाला फोन करून अजगर पकडल्याची माहिती देण्यात आली व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना येवती येथे बोलविण्यात आले . एक तासानंतर वन विभागाची गाडी येवती येथे पोहोचताच सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांच्याकडून सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अजगराला सुखरूप वनरक्षक एम.जी. गोपुलवाड यांच्या ताब्यात देण्यात आहे.
शासनाकडून कसलेही मानधन नसताना सुद्धा एक सामाजिक कर्तव्याची जाण म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक दिवसापासून सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांनी अनेक साप, धामीन, अजगर ,नाग, अशा वन्य जीव प्राण्यांना जीवदान देण्याचे काम केले असून दुसरीकडे विषारी साप, व अजगरा पासून शेतकऱ्यांचाही जीव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. याबद्दल सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र मोठे कौतुक केले जात असून सर्पमित्र यांना शासनाने मानधन व जीवन विमा लागू करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे .
