नांदेड- गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा सण आषाढ शुद्ध पूर्णिमेला साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या कवी कवयित्रींनी आपल्या गुरुंना कवितेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करीत अभिवादन केले. गुरुपौर्णिमेनिमित्य घेण्यात आलेल्या कविसंमेलनात कवयित्री रुपाली वागरे, कवी मारोती कदम, कवयित्री अंजली हिंगोले, कवी भगवान आमलापुरे, सचिन नरेगलकर, मारोती काळबांडे, विक्तुदास होट्टे तसेच काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गुरुपौर्णिमेनिमित्तानेही काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कवी कवयित्रींनी यात सहभाग घेतला. कवयित्री रुपाली वागरे- निसर्ग आपला गुरू, कवी मारोती कदम- गुरु माझे कल्पतरू, कवयित्री अंजली हिंगोले- गुरु ज्ञानाचा झरा, कवी भगवान आमलापुरे- काॅक्रोच म्हणजे, सचिन नरेगलकर- नमन माझे तुम्हास गुरु, मारोती काळबांडे- बुद्धाच्या विहारी, विक्तुदास होट्टे- गुरु माझी माऊली, प्रज्ञाधर ढवळे- गुरुवर तुम्हें मै अशा एकापेक्षा सरस आणि सुरस कविता सादर केल्या. कवितेच्या माध्यमातून सर्व कवी कवयित्री यांनी आपल्या गुरुंप्रती भावसुमनांजली वाहिली.
