सत्य मांडण्याची किंमत; सौरभ द्विवेदी यांचा लल्लनटॉपमधून निरोप  

भारतीय नागरिकांना लल्लनटॉप हे संकेतस्थळ आणि डिजिटल माध्यम चांगल्या प्रकारे परिचित आहे. विविध प्रकारच्या बातम्या, चर्चा आणि कार्यक्रमांमुळे लल्लनटॉपने वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेकांना असे वाटत होते की हे माध्यम पूर्णपणे सौरभ द्विवेदी यांचेच आहे. मात्र अलीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर हे स्पष्ट झाले की लल्लनटॉप हे इंडिया टुडे समूहाचे डिजिटल व्यासपीठ आहे, वैयक्तिक मालकीचे नाही.

सौरभ द्विवेदी यांनी लल्लनटॉपला अत्यंत उच्च पातळीवर नेले. टीआरपी वाढवली, नाव जगभर पोहोचवले आणि वेगवेगळ्या विषयांवर निर्भीडपणे बातम्या मांडून पत्रकारितेतील आपला ठसा उमटवला. एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, याबाबत दुमत नाही.

काही दिवसांपूर्वी इंदूर येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, काही लोकांचा मृत्यू झाला तर अनेकजण रुग्णालयात उपचार घेत होते. या गंभीर घटनेवर सौरभ द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली बातमी तयार करण्यात आली. ही बातमी काही राजकीय घटकांना अप्रिय वाटली, अशी चर्चा आहे. त्यानंतर इंडिया टुडे समूहावर दबाव आला आणि त्याचा परिणाम म्हणून सौरभ द्विवेदी यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला, असे अनेकांचे मत आहे. मात्र याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही.

याच पार्श्वभूमीवर पत्रकार आशिष जाधव यांच्याबाबतही सोशल मीडियावर चर्चा झाली. त्यांनी पूर्वी एका चर्चेत सांगितले होते की भविष्यात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांची युती झाली, तर ते पत्रकारिता सोडून शेतीकडे वळतील. अंबरनाथमध्ये घडलेल्या युतीनंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती युती तुटल्याचे स्पष्ट केल्याने हा विषय तिथेच थांबला.

सौरभ द्विवेदी यांच्या पुढील वाटचालीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते ते चित्रपटसृष्टीत कथालेखन करू शकतात, तर काहींच्या मते ते अभिनयातही पदार्पण करू शकतात. जिओ हॉटस्टारवर येणाऱ्या ‘चंद्रयान’ नावाच्या मालिकेत त्यांच्या सहभागाबाबतही चर्चा सुरू आहे. त्यांनी स्वतः म्हटले आहे की, “मी स्क्रिप्ट रायटर होऊ शकतो, अभिनेता होऊ शकतो, प्राध्यापक होऊ शकतो, आणि पत्रकारही होऊ शकतो.”

त्यांची प्रतिभा आणि अनुभव पाहता ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी ठरतील, याबाबत शंका नाही. मात्र सत्य बातमी मांडल्यामुळे त्यांना पद गमवावे लागले, असे जर खरे असेल, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. मागील काही वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांवर दबाव येण्याचा जो प्रघात निर्माण झाला आहे, तो आजही सुरू असल्याचे चित्र दिसते.

सौरभ द्विवेदी यांनी लल्लनटॉप सोडताना लिहिले की, “लल्लनटॉपने मला ओळख, शिकवण आणि धैर्य दिले. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. तुमचा आणि माझा संबंध येथे संपतो.” गेल्या पाच वर्षांत लल्लनटॉप आणि सौरभ द्विवेदी हे एकच समीकरण झाले होते, पण ते कायमचे नव्हते हे आता स्पष्ट झाले आहे.

एकूणच, इंदूरच्या दूषित पाण्याच्या घटनेनंतर लगेच राजीनामा देणे आणि त्यासंबंधी स्पष्ट कारण न सांगितले जाणे, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्य मांडणाऱ्या एका पत्रकाराला किंमत मोजावी लागली, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. हे सर्व लोकशाहीसाठी आणि मुक्त पत्रकारितेसाठी चिंतेचे लक्षण मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!