रायगडचा राजकीय खेळ — राज्यभर नव्या राजकीय समीकरणांची चाहूल

सध्या बिहार राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी झालेल्या SIR संदर्भात अनेकदा लोकांनी आवाज उठवला, परंतु त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचेही आदेश ऐकले नाहीत आणि आधार कार्डला पुरावा म्हणून मान्यता दिली नाही.

आता महाराष्ट्रात काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावांनी मिळून SIR विरोधात आंदोलन आयोजित केले. या आंदोलनात एवढा प्रचंड जनसागर जमला की परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली.ठाकरे बंधू आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की जुन्या मतदार याद्या वापरून मतदान नको, कारण त्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे. अनेक तक्रारी समोर आल्या तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला सत्ता स्वतःकडे असावी असे वाटते. भारतीय जनता पक्षाने 130 आमदार निवडून आल्यावर लोकसभेतील आपल्या अपयशाचा विसर पडला आहे. लोकसभेतील 48 जागांपैकी दहाही जागा न जिंकू शकले तरी विधानसभेत 130 जागा मिळाल्यामुळे भाजप स्वतःला सर्वात मोठा पक्ष समजू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी “मीच मोठा भाऊ” अशी भावना दिसून येते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष सुरू आहे. तसेच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी चढाओढही अनेक ठिकाणी दिसते. या तिन्ही गटांमध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात संघर्षाचे वातावरण आहे.

पुण्यातील खासदार मोहोळ हे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, परंतु त्यांच्या नावावरचा एक घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांचा एक प्रकल्प रद्द करावा लागला. या प्रकरणात 3000 कोटी रुपयांची जमीन फक्त 230 कोटींना देण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारात मुख्यमंत्री कार्यालयाजवळील काही व्यक्तींचा सहभाग असल्याचेही सांगितले जाते. या 230 कोटी रुपयांमध्ये नागपूरच्या एका व्यक्तीचा आर्थिक हिस्सा असल्याचा संशय आहे, मात्र त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.एकनाथ शिंदे गटाच्या पुणे अध्यक्षांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या सर्व भागांत अशा राजकीय संघर्षांची चर्चा सुरू आहे.

कधीकाळी कोकण हा शिवसेनेचा भक्कम गड होता. कोकणातील कार्यकर्त्यांनीच मुंबईत शिवसेनेला मजबूत केले. मात्र, आज काही जुने शिवसैनिक राष्ट्रवादीकडे गेले आहेत. कोकणात सध्या काही भागांवर उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व आहे, तर काही भागांवर एकनाथ शिंदे गटाचे. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेही कोकणात आपले पाय घट्ट रोवले आहेत.भारतीय जनता पक्ष मात्र कोकणात अत्यंत कमकुवत स्थितीत आहे. त्यांच्या हातात नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र एवढेच चेहरे आहेत. पत्रकार अशोक वानखेडे यांनी आपल्या कार्यक्रमात म्हटले की, कोकणात अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत.

या युतीमुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काहींना वाटते की ही युती शिंदेंना राजकीयदृष्ट्या एकटे पाडण्याचा प्रयत्न असू शकतो. भाजपने अजित पवारांना गुपचूप हिरवा कंदील दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.कोकणातील रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले. हा निर्णय रायगडमधील कर्जत येथे घेण्यात आला. दरम्यान, रायगड जिल्ह्यात महायुतीच्या तीनही घटकांमध्ये वाद सुरू आहेत आणि त्यामुळे या युतीला वेगळे राजकीय अर्थ प्राप्त झाले आहेत.

सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाल्यानंतरही रायगडच्या पालकमंत्र्यांबाबत मतभेद कायम आहेत. कोकणात सुनील तटकरे यांच्या मुलीला पालकमंत्री करण्यात आले, तर पुण्यात राष्ट्रवादी–भाजप गठबंधनातून दुसऱ्या नेत्याची नेमणूक करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनाही कोकणात आपला पालकमंत्री असावा असे वाटते, परंतु अजित पवार सध्या सुनील तटकरे यांना दूर करू शकत नाहीत, कारण लोकसभेत त्यांच्या गटाची ती एकमेव जिंकलेली जागा आहे.या नवीन युतीमुळे शिंदे गटासमोर रणनीती आखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गट यांचा यापुढील राजकीय विचार काय असेल, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

कोकण हा तोच प्रदेश आहे जिथे अब्दुल रहमान अंतुले यांनी इंदिरा गांधींच्या पुनरागमनासाठी मोठी भूमिका बजावली होती आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले. आज मात्र काँग्रेसचा प्रभाव कोकणात जवळपास संपला आहे. शिवसेना मात्र पुन्हा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सज्ज आहे.यामुळे उदय सामंत यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहणार आहे. भाजपा सध्या नारायण राणेंच्या जोरावर कोकणात राजकारण करते, परंतु त्यांचे वर्चस्व आता मर्यादित भागापुरतेच उरले आहे. त्या भागात विरोधक एकत्र आले तर भाजपा पराभूत होण्याची शक्यता निर्माण होते.

कोकणातील ही नवीन राजकीय खेळी फक्त कोकणापुरती मर्यादित राहणार नाही. अशा प्रकारच्या युती इतर जिल्ह्यांतही झाल्या तर “INDIA” आघाडी आणि “NDA” आघाडी या दोन्हींच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील धोरणांमध्ये मोठे बदल घडू शकतात.सध्याच्या घडीला ही घडामोड केवळ एका जिल्ह्यात मर्यादित असली तरी तिचे परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होतील, आणि विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी ही परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक ठरेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!