तालिबानच्या सावलीत अडकलेला पाकिस्तान : शस्त्र, शंका आणि शह

शनिवारी रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर मोठा संघर्ष उफाळून आला. दोन्ही देशांनी एकमेकांवर रात्रीभर हल्ले केल्याचा आरोप केला आहे.पाकिस्तानच्या सैन्याच्या वतीने सांगण्यात आले की, अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी हवाई हल्ले आणि तोफांचा वापर केला. पाकिस्तान सैन्याने म्हटले आहे की, या संघर्षात त्यांच्या २३ जवानांचा मृत्यू झाला असून २९ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यात तालिबानच्या २०० पेक्षा अधिक लढवय्यांना ठार केल्याचा दावाही करण्यात आला आहे.तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले असून ही कारवाई ही ‘बदल्याची’ असल्याचेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला करून त्यांच्या हवाई सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आठवड्यात गुरुवारी, काबूलजवळील एका बाजारपेठेवरही पाकिस्तानने बॉम्बहल्ला केल्याचा आरोप आहे.

 

संबंधांमध्ये वाढता तणाव

प्रश्न उपस्थित होतो की, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध इतके बिघडण्यामागे नेमकं कारण काय आहे?२०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परत आल्यापासून हे दोन्ही शेजारी देश पुन्हा पुन्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर येत आहेत. आतापर्यंतचा हा संघर्ष सर्वात मोठा मानला जातो. पाकिस्तान अफगाणिस्तानवर आरोप करतो की, त्यांनी “तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान” (TTP) या संघटनेला आश्रय दिला आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक घातक हल्ले केले आहेत. मात्र तालिबान हे आरोप फेटाळतात.हा संघर्ष फक्त सुरक्षा प्रश्न नसून, दोन्ही देशांमधील कूटनीती अपयशी ठरल्याचं लक्षण आहे. सुरक्षा विश्लेषक आमिर जिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, दशकांपासून पाकिस्तान अफगाण तालिबानला समर्थन देत होता आणि हे त्यांच्या ‘राष्ट्रीय हिताचं’ मानलं जात होतं. पण आता प्रश्न निर्माण होतो की, “आम्ही कुठे चूक केली?” ही चूक भूतकाळातील असेल किंवा वर्तमानातीलही.

 

दुरंड रेषेचा वाद आणि सीमावर्ती तणाव

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात २५०० किलोमीटर लांब सीमारेषा आहे, जी ‘दुरंड रेषा’ म्हणून ओळखली जाते. या सीमेवरून अनेक वेळा संघर्ष, वाद झाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता घेतल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सत्तेचं स्वागत केलं. पाकिस्तानला वाटत होतं की, त्यांच्या पश्चिम सीमेवर स्थिरता निर्माण होईल आणि TTPवर अंकुश बसेल.मात्र प्रत्यक्षात, पाकिस्तान म्हणतो की, TTPच्या हल्ल्यांमध्ये त्यांच्या शेकडो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाण अधिकारी हे आरोप फेटाळून त्यांना ‘राजकीय’ म्हणतात. दुरंड रेषेवर पाकिस्तानने तार घालण्याच्या प्रयत्नांवरूनही दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता.

 

विश्वासहीनता आणि सुरक्षेचा अभाव

विश्लेषकांच्या मते, दोन्ही देशांमधील विश्वासाच्या अभावामुळे, आर्थिक तणावामुळे आणि प्रभावी सुरक्षा प्रणाली नसल्यामुळे या संघर्षांना खतपाणी मिळतं. इस्लामाबादमधील सुरक्षा विश्लेषक इम्तियाज गुल यांनी सांगितले की, सध्याचा संघर्ष हे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादांचे परिणम आहे.गुल सांगतात की, अफगाण सरकारने TTP विरुद्ध निर्णायक कारवाई करण्यास नकार दिला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानकडे मर्यादित पर्यायच उरले आहेत.

 

गंभीर परिणामांची शक्यता

सामाजिक व्यवहारतज्ज्ञ आणि निरीक्षक मायकेल कुगेल म्हणतात की, या संघर्षाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यांच्या मते, तालिबानकडे पाकिस्तानविरुद्ध थेट लढा देण्याची क्षमता नाही. आणि जर या संघर्षाचा फक्त एकदाच प्रतिउत्तर देण्यात आला, तर जनतेचा राग शांत होणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजू एकमेकांच्या मागे लागल्याचं दिसत आहे.

 

पुढचा टप्पा?

एकंदरीत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष कोणत्या वळणावर जाईल, यावर संपूर्ण दक्षिण आशियातील स्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर भारतात आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचे दौरे कोणते नवे अर्थ घेऊन येतात, हेही लवकरच स्पष्ट होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!