राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे एकत्रीकरणआणि भाजपाची अस्वस्थता

भारतासह जगभरात सुरू असलेल्या इराण-इस्त्राईल संघर्षाची चर्चा आता निवळली आहे आणि त्यामुळे भारतीय जनतेचे लक्ष पुन्हा देशातील राजकीय घडामोडांकडे वळले आहे. सध्याच्या घडामोडींमध्ये बिहारचे राजकारण एक महत्त्वाचा अध्याय ठरत असले तरी, महाराष्ट्रातील ठाकरे बंधूंची संभाव्य एकत्र येण्याची शक्यता हा त्याहून मोठा विषय ठरतो आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. या चर्चेमुळे सर्वाधिक अस्वस्थता भारतीय जनता पक्षात (भाजप) पाहायला मिळत आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस व समाजवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भाजपला या आघाडीकडून मोठा धोका जाणवतो आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार अशी शक्यता अनेक माध्यमांतून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विशेष काळजी घेत आहे की हे दोन बंधू एकत्र येऊ नयेत. कारण मुंबई महानगरपालिका तसेच २७ इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अशा एकत्रिकरणाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.राज ठाकरे यांची भूमिका सध्या ‘किंगमेकर’सारखी झाली आहे. प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या गोटात घेण्यास उत्सुक आहे, पण कोणताही पक्ष त्यांना निर्णायक स्थान देण्यास तयार नाही. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उद्धव ठाकरे यांना वाटते की राज यांनी पुन्हा ‘आपल्या घरी’ म्हणजेच शिवसेनेत यावे. सामना दैनिकात ठाकरे बंधूंच्या जुन्या छायाचित्रांचे प्रकाशित होणे, तसेच ६ जून रोजी उद्धव ठाकरे यांचे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया, हे याच दिशेने संकेत देणारे आहेत.

 

मात्र, १२ जून रोजी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली गुप्त बैठक चर्चेचा विषय बनली आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे गप्प आहेत, यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अनिश्चितता अधिकच वाढली आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून अजूनपर्यंत कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही. उलट, सुरुवातीला मनसेनेच एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता, जो नाकारण्यात आला होता. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्याबाबत उद्धव ठाकरे गटाने घेतलेला आक्षेप अद्याप त्यांच्या मनात आहे.राज ठाकरे जर उद्धव ठाकरे गटासोबत आले, तर त्याचा राजकीय फायदा लगेच उद्धव ठाकरे यांना होईल, पण मनसेचे स्थान दुय्यम राहिल, असा मनसेचा अंदाज आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणासोबत जातील, हेच ठरवेल की पुढील निवडणुकांत कोणाची ताकद वाढेल.

 

मुंबई महानगरपालिका ही गेली तीन दशके शिवसेनेचा गड राहिली आहे. जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले, तर या गडावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे होईल. विधानसभा निवडणुकीत कधीकाळी राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. मात्र, ते राजकारणाचे जाणकार असून, मतांच्या समीकरणांची त्यांना अचूक समज आहे.आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. राज ठाकरे कोणाच्या बाजूने उभे राहतील? भावाच्या, की भावाच्या शत्रूच्या?भाजपासाठी हीच सर्वात मोठी चिंता आहे. कारण जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर दोघांची ताकद परस्परांना बळकट करेल, आणि त्यामुळे भाजपासाठी महाराष्ट्रात नवी आव्हाने उभी राहतील.हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणारी क्षणिक घडी आहे. यातूनच राज ठाकरे यांचे राजकीय भविष्य निश्चित होणार आहे.असे पत्रकार नवीन कुमार यांना वाटते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!