युवावस्थेत स्वतःच्या मनमानीने आयुष्य जगल्याची कबुली स्वतः कंगना राणावत यांनी मुलाखतीत दिली होती. मी खूप नशा केली आहे,असे त्या उघडपणे सांगतात. त्यांच्या अनेक बिनधास्त, अर्धवस्त्रांतील फोटो सार्वजनिक क्षेत्रात आहेत हेही वास्तव आहे.
पण आज त्या इतरांवर बोट दाखवताना दिसतात. राहुल गांधी बोलताना त्यांना टपोरी वाटतात, असा आरोप त्या करतात हा केवळ हास्यास्पद नाही, तर दुहेरी मापदंडाचा पराकाष्ठा आहे. ज्या व्यक्तीचा समाजावर प्रभाव असतो, त्याने जबाबदारीने बोलायला हवे. पण इथे उलट इतरांवर आरोप करण्यातच आनंद घेतला जातो.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना “₹100 मध्ये बिकाऊ” म्हणणारी हीच कंगना आज नैतिकतेचे धडे देत आहे ही विडंबनाच म्हणावी लागेल. संसदेला स्टुडिओ समजून, चकचकीत कपडे घालून अभिनय करण्याची जागा आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कंगनाने, उच्चशिक्षित खासदार राहुल गांधींवर बोट उचलणे, हेच त्यांच्या राजकीय समजुतीचे द्योतक आहे. पंजाबमधील काही खासदारांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले कंगनाला संसद आणि चित्रपट सेट यातील फरकच कळलेला नाही.


त्यांच्या अलीकडच्या चित्रपटांचा अपयशाचा इतिहासही लपून राहिलेला नाही. बॉलीवूडमध्ये त्यांची गरज उरलेली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच कदाचित राहुल गांधींना लक्ष्य करून स्वतःची रोजीरोटी चालवण्याचा हा स्वस्त प्रयत्न सुरू आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनीही स्पष्ट केले पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना जी भूमिका घेतली जात होती, तीच आता राहुल गांधींबाबत घेतली जाते; पण अशा पद्धतीने सार्वजनिक वक्तव्य करणे अयोग्यच आहे. काँग्रेस खासदार ज्योती मणी यांनी तर थेट म्हटले कंगनाचे वक्तव्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे दर्शन घडवते. चांगले कपडे आणि सेलिब्रिटी दर्जा म्हणजे चांगले चारित्र्य असतेच असे नाही.
राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की, राहुल गांधींवर टीका करण्यासाठी अशा व्यक्तींना पुढे केले जात आहे, ज्यांची स्वतःची विश्वासार्हताच संशयास्पद आहे. आज देशात महागाई, बेरोजगारी, मणिपूरसारखी गंभीर परिस्थिती, आंतरराष्ट्रीय तणाव अशा असंख्य प्रश्नांवर सरकार गप्प आहे. पण राहुल गांधी चहा पितात, यावरून देशाची अब्रू जाते, असे सांगितले जाते ही किती विचित्र मानसिकता आहे! मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून फिरवले गेले, तेव्हा देशाची अब्रू गेली नाही का? शेतकरी आंदोलनात महिलांचा अपमान झाला, तेव्हा कुणी आवाज उठवला का? कंगना राणावत यांनी आता तरी बोलताना भान ठेवावे. कारण इतिहास सगळं लक्षात ठेवतो आणि जनताही.

