माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील मौजे हानमंतवाडी येथे विरोधी पक्षातील लोकांना मदत करत असल्याच्या संशयातून दोघांनी एका व्यक्तीस शिवीगाळ करून चाकूने मारहाण केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या मारहाणीत फिर्यादीच्या जवळील मोबाईल, आधार कार्ड, बँक पासबुक तसेच रोख ५० हजार रुपये असा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार माळाकोळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मौजे हानमंतवाडी, ता. कंधार येथे अमृत राजकुमार गांजरे आणि गोविंद राजकुमार गांजरे, दोघेही रा. हानमंतवाडी, ता. कंधार यांनी संगनमत करून फिर्यादी तुकाराम पांडुरंग गांजरे (वय ४७) यांना विरोधी पक्षातील लोकांना का बोलतोस व त्यांना मदत का करतोस, असा जाब विचारला.
यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून चाकूच्या उजव्या हातावर दुखापत केली. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल, आधार कार्ड, बँक पासबुक आणि रोख ५० हजार रुपये असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तुकाराम पांडुरंग गांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०९(६), ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि हिंगोले करीत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
