नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सरदार इंदरजीत सिंग बावरी यांच्या हत्येचा निषेध नोंदवत या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, हत्येतील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी ऑल शिख सिकलीगर असोसिएशनच्या वतीने सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सकाळी साडेअकराच्या सुमारास सचखंड गुरुद्वारा, गेट क्रमांक २ येथून मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन शीख समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. एसआयटी स्थापन झालीच पाहिजे, हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. एका शीख तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र संताप असल्याचे यावेळी दिसून आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. बावरी हत्या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष पद्धतीने व्हावा, यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथकाची स्थापना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

