मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी बाचोटी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये ठराव क्रमांक ११ अन्वये गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत दारू विक्री होत असल्याने येथील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती या ठरावात व्यक्त करण्यात आली आहे.
गावातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. या ठरावाचे सूचक नितेश अप्पाराव वरपुडे होते, तर सतिश दिनाजी बाऊडे यांनी या ठरावास अनुमोदन दिले.
ग्रामसभेने एकमुखाने हा ठराव पारित केला असून, यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयामुळे बाचोटी गावातील महिला आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.
