नांदेड – राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशानुसार राज्यात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने बैठकीत सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने घरोघरी तिरंगा व वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुढीलप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध विभाग, कार्यालयांना निर्देशीत केले आहे.
वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या निर्देशाप्रमाणे संबंधित विभागाने कार्यवाही करून ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावा. वंदे मातरम या गितास 150 वर्षे पूर्ण झाल्याने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घ्यावा, घरोघरी तिरंगा अभियान तसेच वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शन आयोजित करावे, हर घर तिरंगा अभियान निमित्त तिरंगा रंगाची रोषणाई करणे, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, सेल्फी विथ तिरंगा- वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिरंगा सेल्फी, वंदे मातरम गीत असलेले व्हिडीओ Harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करावे, वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रांगोळी यासारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश केला आहे. त्यानुसार संबंधित विभाग व कार्यालयाने कार्यवाही पूर्ण करावी.
तसेच हर घर तिरंगा अभियान या अभियानासाठी एक केंद्री संपर्कासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात आला असून या कक्षाच्या प्रमुख पदी सहाय्यक संचालक संदीप बलखंडे मो. 9763068083 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियाना दरम्यान काही समस्या, प्रश्न उद्भवल्यास, सदरील कक्षाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन, योग्य ती कार्यवाही करावी. या अभियानांतर्गत उचित कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे dygennanded@gmail.com या मेलवर 20 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठविण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्देशीत केले आहे.
