अर्धापुरात गोवंश तस्करीवर पोलिसांचा छापा; १२ बैलांसह ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. महादेव कॉलनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी १२ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहनासह एकूण सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अर्धापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी महादेव कॉलनी येथील कॅनॉलच्या पूर्वेकडील परिसरात सापळा रचला. यावेळी महिंद्रा पिकअप वाहनामध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने व निर्दयीपणे बांधून वाहतुकीसाठी नेण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १२ बैलांची सुटका केली.

जप्त करण्यात आलेल्या १२ गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत ४ लाख ६५ हजार रुपये, तर महिंद्रा पिकअप वाहनाची किंमत अंदाजे ४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशाप्रकारे एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील काही आरोपींची नावे पोलिसांनी नमूद केली असून, एक आरोपी फरार असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!