नांदेड: शहरात स्वखर्चाने सामाजिक हितासाठी रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर नाका परिसरात घडला आहे.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका न्यूज चॅनेलच्या संपादकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सय्यद फसिओद्दीन (वय ४६ वर्षे, रा. रहमत नगर) हे व्यावसायिक असून त्यांनी २९ मार्च २०२६ रोजी रात्रीपासून देगलूर नाका येथील खराब रस्त्यामुळे होणारा त्रास पाहून स्वखर्चाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले होते.३० मार्च रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास ते काम पाहत असताना आरोपी शेख याहिया शेख इसाक, शेख अजहर याहिया आणि बशीर लाला हे त्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांनी सांगितले की हे रस्त्याचे कम करण्याचे सर्व पैसे महानगर पालिका तुम्हाला देणार आहे. शेख याहिया याने स्वतःला महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचा आणि पुकार या वर्तमान पत्राचा संपादक असल्याचे सांगून तक्रारदाराला विचारले की, तुम्ही रस्ता दुरुस्तीचे काम का करत आहात? जर हे काम सुरू ठेवायचे असेल तर १,००,००० (एक लाख) रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपींनी केली. पैसे न दिल्यास न्यूज चॅनेलवरून बदनामी करण्याची आणि खोट्या पोलीस तक्रारी करून अडकवण्याची धमकीही आरोपींनी दिली.
धमकी नंतर सय्यद फसिओद्दीन यांनी इतवारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८(२) (खंडणी) आणि ३(५) (समान हेतू) अंतर्गत गुन्हा क्रमांक ८९/२०२६ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर खन्नाळ यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे हे करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी एका महिलेला पोलीस ठाणे इतवारा परिसरात जाळून घेण्यास सांगितले होते. त्याही प्रकरणात शेख याहिया आणि मुलगा शेख अजहर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.या पत्रकाराच्या भीतीने जनतेतील लोकांनी आज पर्यंत तक्रार दिली नसेल तर त्यांनी पण तक्रारी दिल्या तर पोलीस त्यांचे नाव गुप्त ठेवून तक्रारी दाखल करतील अशी तरतूत सुद्धा कायद्यात आहे.
