अर्धापूर (प्रतिनिधी) – जांभरून,वाहेदपूर ते मेंढळा येथील सत्य गणपती मंदिराजवळून जाणारा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, गट क्रमांक 270, 271, 272 मधील सत्य गणपती पांदण शिवरस्ता दीर्घकाळापासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मंदिरात येणाऱ्या भाविकांना गैरसोय होत असून, रस्त्यालगत योग्य नाली व लघुशौचालयाची सुविधा नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे.
महिला व मुलींना उघड्यावर लघुशंका करावी लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांसाठीही ही परिस्थिती गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे रस्ता खुला करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, मेंढळा परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतमाल बाजारात नेण्यासाठी जवळचा मार्ग बंद असल्याने अतिरिक्त खर्च व वेळ वाया जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता खुला करून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सत्य गणपती मंदिर परिसरात आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही मागणी रामचंद्र (मनोज) माणिकराव मनपूर्वक यांनी केली असून, संबंधित निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पांदण रस्त्याचे काम पुढील 10 ते 15 दिवसांत मार्गी लावावे, अशी नम्र विनंती नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
