नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी शपथ व रॅलीचे आयोजन

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड  -भारत सरकारच्या “बालविवाहमुक्त भारत 100 दिवस संकल्प महाराष्ट्र मोहिमेला” नांदेड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन, विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचा या उपक्रमाला जाहीर पाठिंबा आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक रॅली, प्रतिज्ञा, कॅण्डल मार्च, मंदिरांबाहेर बालविवाहमुक्त नोटीस बोर्ड लावणे, धर्मगुरूंमार्फत शपथ, ‘बालविवाहमुक्त ग्राम’ ठराव अशा उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात होत आहे.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, नांदेड येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी “नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करणार” असा दृढ संकल्प व्यक्त करत शपथ घेतली.

कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ. विद्या आळणे,शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तिवडे, शिक्षकवृंद, जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचे अरुण कांबळे, जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गोपाळ मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!