*जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद* नांदेड– जिल्ह्याला एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित आहे. या जलतारा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील खांबेगाव येथे करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसिलदार मेकाळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी लक्ष्मण हांडे, उपकृषी अधिकारी मोहनराव देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी, सरपंच संदीप पोळ, मनरेगा विभाग लोहा, खांबेगावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तसेच वॉटर संस्थेची टीम आदीची उपस्थिती होती. Catch the Rain-where it Falls, when it Falls या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे, जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मनरेगा विभाग व भारत रुलर लाइव्हलीहुड फाऊंडेशन (बीआरएलएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प सुरु आहे. लोहा आणि नांदेड तालुक्यात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रकल्पातील 36 गावांचे सविस्तर प्रकल्प आराखडे पाणलोटच्या संकल्पनेनुसार व मनरेगातील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामांना प्राधान्य देवून तयार करण्यात आले आहेत. जलतारामुळे शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन जिभडल्या जाते अशा ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करुन त्यात मोठे व मध्यम दगड भरुन जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमीनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहिर-बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. त्यामुळे जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांनी केल्यास कामाचा कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल. नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाअंतर्गत ग्रा. पं. हळदव येथे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना भेट देवून प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. 00000 Kanthak Suryatal Post Views: 632 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक; अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल