५४ वर्षांपूर्वीची बातमी, आजची राजकीय झळ; सैन्याच्या शांत ट्विटला अमेरिकाविरोधी रणभेरी ठरवणारे कोण?

५४ वर्षांपूर्वीच्या बातमीला सैन्याने ट्विट केले. पण त्या ट्वीटला अनुसरून प्रसारित केलेल्या बातम्यांद्वारे एक नवीन कथा उभी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न उलट नाराजी आणि टीकेचा विषय बनला.

गोदी मीडियाने प्रसारित केलेली बातमी अशी आहे की, १९७१ च्या युद्धासंदर्भात भारतीय सैन्याने एक वृत्तपत्रातील बातमी शेअर केली. त्या बातमीत लिहिले होते की अमेरिकेने पाकिस्तानला युद्धासाठी शस्त्रसाठा दिला होता. त्यास प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने दोन अब्ज डॉलर्सच्या हत्यारांची आठवण करून दिली. तसेच, रशियाकडून कच्चे तेल घेत असल्याच्या कारणावरून अमेरिका भारतावर दबाव टाकत असल्याचेही त्या शेअर केलेल्या बातमीतून सूचित होत होते.भारतीय सैन्याने शेअर केलेल्या त्या बातमीच्या माध्यमातून १९७१ मधील “अंकल सॅम”च्या दुटप्पी धोरणावर निशाणा साधल्याचे चित्र उभे राहिले. पुढील बातमीमध्ये म्हटले होते की अमेरिका त्या काळात पाकिस्तानला सुमारे १७,५०० कोटींचे (२ अब्ज डॉलर्स) हत्यार पाठवत होती, आणि भारतीय सैन्याने याची आठवण करून दिली.यासोबत काही माध्यमांनी अशीही बातमी प्रकाशित केली की, भारतीय सैन्याने ट्रम्प यांच्यावर “जबरदस्त हल्ला” केला असून त्यांच्या विरोधात “पेपर कात्रण” वापरले. याशिवाय, पाकिस्तान आणि अमेरिकेतील मैत्रीचे “रहस्य” उघड झाल्याची भाषा वापरण्यात आली.

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानला अमेरिकेने पाठिंबा दिला होता हे स्पष्ट करण्यासाठी त्या काळातील बातम्या शेअर करण्यात आल्या. काही बातम्यांमध्ये म्हटले आहे की भारतीय सैन्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. मात्र प्रत्यक्षात, सैन्याच्या ट्विटमध्ये कुठेही डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नव्हते, किंवा अमेरिकेवर थेट टीका नव्हती.आजच्या घडीला काही माध्यमे आणि सोशल मीडियावरील “व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी”ने या ट्विटवरून चुकीचे अर्थ लावून अमेरिका-विरोधी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याचे वक्तव्य किंवा शेअर केलेली माहिती ही इतिहासातील वास्तव आहे, त्यामागे कोणत्याही राजकीय हेतूचा संकेत नाही.

सैन्याने फक्त १९७१ च्या बातम्या शेअर केल्या आहेत – त्या वेळी पाकिस्तानला अमेरिकेने हत्यारे दिल्याचा उल्लेख आहे. हे ट्विट म्हणजे आजच्या राजकीय नेतृत्वाचे भित्रेपण उघड करणारे साधन झाले आहे, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु, सैन्याने कुठेही थेट अमेरिकेवर आरोप केलेले नाहीत.राज्यसभेच्या कार्यवाहीत, त्या वेळी काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांनी संसदेत सांगितले होते की अमेरिका, नाटो आणि चीन पाकिस्तानला हत्यारे देत होते. हे उत्तर सीपीआयचे भूपेश गुप्ता यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले गेले होते. मात्र,यंदा ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत सरकारने संसदेत अमेरिका या देशाचे नाव थेट घेतले नव्हते.

 

५ ऑगस्ट १९७१ ला युद्धाची तयारी सुरु झाली होती, असे त्या सैन्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तेव्हापासून आजतागायत अमेरिकेने पाकिस्तानला सुमारे दोन अब्ज डॉलर्सचे हत्यारे दिल्याचा उल्लेखही त्या ट्विटमध्ये आहे.तेव्हाची एक बातमी सैन्याने जोडली आहे.

हे सर्व लक्षात घेतल्यास, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय सैन्य कोणत्याही परदेशी राष्ट्रप्रमुखावर थेट टीका करीत नाही. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत सैन्याचे काम संरक्षण करणे असते, राजकीय वक्तव्य करणे नव्हे. राजकीय प्रतिसाद हे सरकारचे काम असते.पाकिस्तानसारख्या देशात सैन्य राजकारणात हस्तक्षेप करते, परंतु भारतीय सैन्य तसे करत नाही, हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यामुळे, या एका ट्विटवरून अमेरिकेवर निशाणा साधल्याच्या बातम्या पसरवणारे माध्यम किंवा मंडळी लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेचे कारण ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!