बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

 शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे शासनाचे विभागाचे आवाहन
नांदेड – बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यास बांधील आहे. कोणत्याही क्षणी बाभळी बंधाऱ्यातून तातडीने पाणी सोडले जाणार आहे, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
जलसंपदा विभागामार्फत दिनांक 17 मार्च रोजी जाहीर निवेदन देऊन बाभळी बंधार्‍यालगतच्या शेतकऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आली होती. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या ऊर्जाव्यय व्यवस्थेचे क्षतिग्रस्त काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याकारणाने बाभळी बंधार्‍यातून काही प्रमाणात अंशतः पाणी नदीपात्रात सोडून ऊर्जाव्यय व्यवस्थेचे काम हाती घेतले जाणार आहे.
20 मार्च रोजी बाभळी बंधाऱ्याचे पाणी सोडण्याकरिता जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करण्याकरिता कर्मचारी बंधार्‍यावर आले असता, बळेगाव व बाभळी बंधाऱ्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी सोडण्यास विरोध केला.
20 मार्चला शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने शेताचे नुकसान होईल व शेतीसाठी पुढे पाणी राहणार नाही अशा काही अफवाही या भागात पसरविण्यात आल्या आहे. यामध्ये तथ्य नाही, असा खुलासा जलसंपदा विभागाने केला आहे.
बंधाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर नियंत्रणासाठी जलसंपदा विभागाला काही कामे वेळेत करणे आवश्यक असते. त्याचा एक टाईम टेबल ठरला असतो. त्यामुळे सदरचे काम हे वर्षातील बाकीच्या वेळी हाती घेणे शक्य नाही. कारण जून, जुलैमध्ये गोदावरी नदीत केव्हाही पावसामुळे पाणी येऊन पूर परिस्थिती उद्भवू शकते. हे काम पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी केले नाही तर पुराच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त भागात आणखी नुकसान होऊन बंधाऱ्याच्या फाउंडेशनला धोका उत्पन्न होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी भविष्यात होणाऱ्या अकल्पित नुकसानाला लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या क्षतिग्रस्त ऊर्जाव्यय व्यवस्थेचे काम पूर्ण करू द्यावे, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.
त्यामुळे वृत्तपत्राद्वारे जाहीर निवेदनातून कळविण्यात येते की, बाभळी बंधाऱ्यातील पाणी अंशतः कमी करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागामार्फत कोणत्याही क्षणी करण्यात येऊ शकते. त्यामुळे बळेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. बळेगाव बंधाऱ्याच्या खालील बाजूच्या शेतकऱ्यांना यामुळे आवाहन करण्यात येते की, या कार्यवाहीला सहकार्य करावे. कोणत्याही अफवा व चुकीच्या गैरसमजावर अवलंबून जलसंपदा विभागाच्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण केल्यास धरण सुरक्षिततेचा कायदा 2021 तसेच पाटबंधारे अधिनियम 1966 अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!