जलसंपदा विभागाद्वारे जलजागृती रॅलीद्वारे दिला संदेश
नांदेड (प्रतिनिधी)-पाणी हे अमूल्य आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजून त्याचा जबाबदारीने वापर करा. पाण्याचा माफक व योग्य वापर करा,असा संदेश देणारी जलजागृती रॅली मंगळवारी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
या जलजागृती रॅलीचे नेतृत्व केले ते नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ.आ.दाभाडे यांनी. आपल्या शेतात, आपल्या घरात आणि औद्योगिक उपयोगासाठी अत्यंत कमी दरात पाणी पोहोचविणारे जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या जलजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सर्व नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व कळावे यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.
जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांच्यामार्फत दिनांक 18 मार्च रोजी जलजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील रॅलीचा मार्ग जलसंपदा विभागीय कार्यालयीन परिसर चैतन्यनगर ते राजकॉर्नर, शेतकरी चौक मार्गे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृह, भगिरथनगर असा होता. या रॅलीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .सी.आर.बनसोड यांनी पाण्याच्या अपव्यय न करता पाण्याचा जास्तीत जास्त पुर्नवापर करावा. याकरीता स्थानिक पातळीवर विविध उपाययाजेना राबवाव्यात असे मार्गदर्शन केले. त्यानंतर आ.शि.चौगले यांनी पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वातावरण बदल व अनिश्चित पर्जन्यमानामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून याबाबत जनसामान्यांत क्षेत्रीय अभियंता व कर्मचा-यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करून सिंचनासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ.आ.दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्याची जलनिती व जलसंपदा विभागाने केलेली आजवरची कामगिरी याबद्दल माहिती दिली. 22 मार्च या जागतिक जलदिनाचे महत्व विषद केले. तसेच माधवराव चितळे, जागतिक जलतज्ञ यांनी पाण्याबाबत आजपर्यंत जागतिक स्तरावर केलेल्या कामांना उजाळा दिला. जलसंपदा विभागातील कर्मच-यांनी गावो-गावी जावून शेतक-यांमध्ये व पाणीवापरकर्त्यांमध्ये जलजागृती करावी. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी ए.बी.जगताप, कार्यकारी अभियंता व मंडळातील उपविभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.