रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 15 नोव्हेंबर 2024 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक

रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. मुदतीनंतर आलेले पाणी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पाणी अर्ज दिला म्हणजे परवानगी मिळाली असे गृहीत धरु नये याची नोंद घेण्यात यावी. नमुना नं. 7 चे कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामुल्य उपलब्ध आहेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कार्यालय जबाबदार असणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. शासन निर्णयात नमूद दरानुसार सन 2024-25 साठीचे पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. कालव्यावरील लाभधारक थकबाकीदार असल्यास पुर्णपणे पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!