जमीन गहाण ठेवून व्याजाची वसुली केल्यानंतर सुध्दा 1 कोटी खंडणी मागल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्ष झाल्यानंतर सुध्दा आजही हुकूमशाहीचा प्रकार चालतच असतो हे अर्धापूर पोलीस ठाण्यात 1 कोटीच्या खंडणी मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिसते. या गुन्हा घडण्याची तारीख 1 जुलै पुर्वीची असल्यामुळे हा गुन्हा भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला आहे. पण पोलीस प्राथमिकीमधील शब्दांप्रमाणे या गुन्ह्यात सावकारी कायदा जोडला गेला पाहिजे असे वाटते.
बेलसर ता.अर्धापूर येथील 70 वर्षीय महिला गिताबाई अवधुतराव क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेलसर शिवारात गट क्रमांक 110 मध्ये त्यांची 0.40 आर जमीन आहे. ही जमीन त्यांना सासरच्या मंडळींनी दिली आहे. त्यांच्या पतीचे निधन 1991 मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा आनंदराव क्षीरसागर त्यांची सून आणि नातू या जामीनीचा कारभार पाहतात.
एकदा खाजगी कामासाठी पैशांची गरज पडली असता आनंदराव क्षीरसागरने गोविंद रंगराव लोमटे (रावसाहेब) यांच्याकडून 5 टक्के दराने 4 लाख 30 हजार रुपये घेतले आणि बेलसर शिवारातील गट क्रमांक 110 मधील माझी 0.40 आर जमीन 26 जुलै 2013 रोजी त्यांच्या नावाने रजिस्ट्री (रहित बैयनामा) करून दिली. परंतू आजही त्या जमीनीवर माझा ताबा आहे आणि त्या जमीनीच्या उत्पन्नातूनच माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो.
सन 2014 मध्ये गोविंदराव रंगराव लोमटे(रावसाहेब) आणि त्यांचे काका उत्तम लोमटे हे आमच्या घरी आले आणि 5 टक्के दराने दिलेल्या 4 लाख 30 हजारांचे व्याज 2 लाख 58 हजार रुपये झाल्याचे सांगितले. तेंव्हा माझा मुलगा आनंद क्षीरसागर यांनी आठ दिवसात व्याजाचे 2 लाख 58 हजार रुपये लोमटे यांना दिले. त्यावेळी बरेच लोक उपस्थित होते. ऑगस्ट 2015 मध्ये माझ्या मुलाने गावातील मरीबा बरकमकर यांच्यासोबत घेवून जाऊन ते पैसे दिले होते. पुढे माझ्या मुुलाने त्यांच्याकडून घेतलेल्या 4 लाख 30 हजार रुपयांची सोय केली. डिसेंबर 2015 मध्ये त्याच्यावरील व्याज मिळून 5 लाख 30 हजार रुपये गोविंद लोमटे व उत्तम लोमटे यांना दिले आणि आमची गहाण ठेवलेली जमीन परत आमच्या नावे करून देण्यास सांगितली. दरम्यान माझा मुलगा आनंदराव यांचाही मृत्यू झाला.
पण आज-उद्या करत त्यांनी आमची जमीन आमच्या नावावर करून दिली नाही. उलट 19 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजता आमच्या शेतात येवून जेसीबी क्रमांक एम.एच.26 एच 1663 द्वारे आमच्या शेतातील विहिर बुजवत असतांना माझी सुन, माझे नातू आणि गावातील मंडळी तेथे गेले असतांना गोविंद लोमटे आणि उत्तम लोमटे यांनी संागितले की, तुम्ही आमच्याकडून व्याजाने 20 लाख रुपये घेतले आहेत आणि त्याचे आता 1 कोटी झाले आहेत.ते पैसे आणून द्या तरच आम्ही शेतात बाहेर जाऊ. 1 कोटी आणून दिल्याशिवाय शेतात पाय ठेवला तर जेसीबीच्या खाली टाकून तुम्हाला मारून टाकू अशी धमकी पण दिली. त्यावेळी त्यांनी आमच्या शेतातील विहिर बुजवून 3 लाख रुपयांचे नुकसान पण केले आहे.
या तक्रारीनुसार अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 386, 447, 427 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 370/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत लोमटे यांनी न्यायालयात सुध्दा वाद दाखल केले होते. परंतू त्या वादांबद्दल त्यांच्या विरोधात निकाल लागला. तक्रारीतील शब्द पाहता या गुन्ह्यात सावकारी कायदा जोडला गेला पाहिजे असे वाटते.
लोमटे यांच्याबद्दल माहिती सांगतांना एका माहितीगाराने सांगितले की, त्यांच्या गाडीवर पंजा चे निशाण लावलेले आहे. यावरुन त्यांचा आणि कॉंगे्रस पक्षाचा काही तरी संबंध आहे असे म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!