कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा

 

नांदेड- कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत नांदेड जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामात क्रॉपसॅप, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, राज्य पुरस्कृत योजना या योजनांच्या समन्वयातून सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी एकूण जिल्ह्यात एकूण ३०८ पिकनिहाय शेतीशाळा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एका शेतीशाळेमध्ये २५ शेतकऱ्यांच्या समावेश असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ७०० शेतकऱ्यांना वरील तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तरी या शेतीशाळेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवणे, शेतीसंदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्रयत्न करणे, क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत समाविष्ट पिके तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे, या उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे इ. उद्देशाने क्षेत्रीय स्तरावर पिकनिहाय नवीन तंत्रज्ञान व त्या संबंधित कौशल्ये शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषि विभागातील नियमित क्षेत्रीय कर्मचारी व क्षेत्रीय पातळीवर आत्मातंर्गत कार्यरत एटीएम, बीटीएम, शेतकरी मित्र, आणि कृषि सखी यांचा योग्य समन्वय साधून कृषि विस्तार कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे ग्रामपातळीपर्यंत एकत्रीतपणे राबविण्याचे आयोजन करण्यात येत आहे. या शेतीशाळेमध्ये प्रयोगशील शेतकरी (Host farmer) व प्रक्षेत्र, शेतकऱ्यांचा गट, महिला गट, तंत्रज्ञान/अभ्यासक्रम (curriculum), प्रशिक्षण साहित्य आणि अत्यावश्यक निविष्ठा (Critical inputs) हे शेतीशाळेचे प्रमुख घटक आहेत.

पर्यावरणपूरक व हवामान अनुकूल अशा शाश्वत पीक उत्पादन पद्धतीस चालना देणे. सुधारीत व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना उपयुक्त करणे, प्रत्यक्ष कृतीतुन शिक्षणाद्वारे पिकांवरील विविध किडी, रोग, त्यावरील मित्रकिटक व त्यांचे शेतीतील महत्व शेतकऱ्यांना पटवून देणे. संबंधित पिकाच्या मुल्यसाखळीची शेतकऱ्यांना माहिती तयार करून देणे, जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणारे रोग व किडीचा पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके राबविणे, पीक उत्पादन, प्रक्रिया व बाजारमुल्य संबंधीत शासकीय व खाजगी संस्था, संशोधन संस्था व शेतकरी यांच्यामध्ये समन्वय व संपर्क वाढविणे. शेतकरी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धींगत करणे, त्यांच्यामध्ये खिलाडूवृत्ती वाढविणे, सुप्त गुणांना चालना देणे तसेच उत्साहाची भावना निर्माण करणे. कॉपसॅप संलग्न शेतीशाळेमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, ऊस व हरभरा या पिकांचे पेरणीपूर्व ते काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत पिक वाढीच्या अवस्थेनुसार वर्ग निहाय मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे हे शेतीशाळेचे उद्देश्य आहेत.

शेतीशाळेद्वारे शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी पुढील चार महत्वाचे टप्पे पाडलेले आहेत. (पिकनिहाय या टप्प्यांमध्ये वाढ होऊ शकते)

1. पेरणीपूर्वः माती परीक्षण करणे, जमीन तयार करणे, समतल मशागत, जागच्या जागी पाणी मुरवण्याची व्यवस्था करणे, खरीप हंगामासाठी त्या पिकासाठी योग्य अशा पिक वाणाची निवड करणे, पेरणीपूर्व उगवण क्षमता तपासणे.

2. पेरणीच्या वेळी: बियाणे प्रक्रिया करणे, पेरणी पध्दती, रुंद सरी वरंबा पध्दती (BBF) चा वापर करणे, पट्टा पध्दतीने पेरणी करणे, विविध खतांचा पहिला हप्ता देणे, तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर यावर भर देण्यात येईल.

3. पिक वाढीच्या अवस्थाः हा टप्पा दीर्घकाळासाठी असल्याने यामध्ये योग्य प्रकारे आंतरमशागत, तण व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिकासाठी पाणी व्यवस्थापन यामध्ये जीवसंरक्षक सिंचनाचा अंतर्भाव राहील.

4. काढणीच्या वेळी व काढणीत्तर व्यवस्थापनः यामध्ये काढणीची योग्य वेळ व पध्दती, काढणीनंतर त्याला वाळविणे, सफासफाई करणे, ग्रेडींग करणे, योग्य पध्दतीने साठवणूक करणे तसेच काढणी पश्चात उत्पादीत मालावर प्रक्रीया करणे, संबंधित पिकांची मुल्यसाखळी इत्यादी बाबी वर उल्लेख केलेल्या विविध टप्प्यामध्ये जे तंत्रज्ञान व कौशल्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे आहे.

पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानिक कृषी हवामान पद्धतीचा, स्थानिक पिक पद्धतीचा विचार करून प्रकल्प क्षेत्रातील प्रमुख पिकांसाठी कृषी विद्यापीठाने व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी विकसित केलेले, (एनआयसीआरए) या प्रकल्पामध्ये अवलंबलेले, प्रयोगशील शेतकऱ्यांनी अवलंबलेले आणि कृषी विज्ञान केंद्रांनी पडताळणी केलेले हवामान अनुकूल तंत्रज्ञान निश्चित करून त्याचा काटेकोरपणे अवलंब करण्यासाठी शेतीशाळेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, हवामान अनुकूल वानांचा अवलंब, समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती, आच्छादनाचा वापर, हिरवळीच्या खताचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन, संरक्षित सिंचन, संरक्षित लागवड.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी मृदा तपासणी अहवाल तसेच आवश्यकतेनुसार जैविक व रासायनिक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये आणि भूसुधारके (जिप्सम इ.) यांचा वापर करण्याबाबत शेतीशाळेच्या पहिल्या वर्गामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येणार असून कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करून खतांचा कार्यक्षम वापर व खत बचत करण्याच्या अनुषंगाने वापरावयाचे तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना अवगत करणार आहेत.

शेतीशाळामध्ये पिक प्रात्यक्षिकांसाठी कृषी विभागाच्या जैविक कीड नियंत्रक प्रयोगशाळेकडून पिक प्रात्यक्षिकांसाठी द्रवरूप जीवाणू खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जीवाणूंचा समावेश असतो. सदर जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *