मतदानानंतर रडण्यापेक्षा मतदान करण्याअगोदरच पुर्ण विचार करून मतदान करा

कंथक सुर्यतळ
नांदेड-उद्या सकाळी 7 वाजता सुरू होणारे 16 व्या लोकसभेचे मतदान सायंकाळी संपेल. मतदारांनी पुर्णता: विचार करून मतदान करण्याची गरज आहे. नाही तर पुढील पाच वर्ष आपले चुकले असे म्हणत रडत बसण्यात काही अर्थ राहणार नाही. तेंव्हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वात महत्वाचा अधिकार मतदान हे अत्यंत दक्षतेने, विचारपुर्वक मतदारांनी करावे आणि आपल्या मतदानाच्या अधिकाराचा सुदृढ वापर करावा.
शुक्रवार दि.26 एप्रिल 2024 रोजी लोकसभेच्या मतदानातील दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे. त्यात नांदेड लोकसभा मतदार संघासह अनेक लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. प्रशासनाच्यावतीने अनेक वेळेस मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. जनजागृती करण्यात आली. परंतू जे कार्यक्रम घेण्यात आले. त्या कार्यक्रमात हजर राहणारी मंडळी फक्त प्रशासनिक अधिकाऱ्यांसोबत फोटो काढणारी होती. त्यांनी कोणालाच सांगितलेले नाही. किंवा इतर मंडळीही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांना आपले काम सोडून मतदानासाठी लोकजागृती करायला वेळे कोठे आहे. तरी पण प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नाकारता येणार नाही. यश किती येईल हे लोकसभेचे मतदान संपल्यानंतर आपोआप लक्षात येईल. आम्ही तर गेली 30 वर्ष मतदार जागृती करत करत आपल्या लेखणीला झिजवत आहोत. आजही तेच करत आहोत.
भारतीय नागरीकांना भारतीय राज्य घटनेने दिलेले अनेक महत्वपुर्ण अधिकार आहेत. त्यात सर्वात महत्वपुर्ण अधिकार मतदानाचा आहे. आज ज्यांना विचार करता येतो त्यांनी विचार जरूर करावा की, आजपर्यंत त्यांनी किती वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मतदान केले आणि त्या मतदानानंतर निवडुण आलेल्या पदाधिकाऱ्यांने त्यांच्यासाठी काय केले. याचे उत्तर नक्कीच नकारात्मक असेल. या नकारात्मक उत्तरांची कारण मिमांसा केली तर निवडुण आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा मोदकांचा सहारा घेतलेला आहे. त्यांनी जनतेचा विचारच कधी केलेला नाही. फक्त फोटो काढणे, बातम्या छापुन आणणे यापेक्षा त्यांनी जास्त काही केलेले नाही. नांदेड लोकसभा मतदार संघातील निवडुण आलेल्या किती उमेदवारांनी लोकसभेच्या कामकाजात आपला सहभाग नोंदवला याचा ईतिहास काढला तर फक्त काहीच नावे येतील. ज्यांनी खऱ्या अर्थाने नांदेडचे प्रतिनिधीत्व लोकसभेत गाजवले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जण वेगवेगळी खलबते वापरतो आहे. या खलबत्तांमध्ये सर्वात महत्वपुर्ण जाती व्यवस्था आहे. जात सोडून निवडणुकीला कधीच रंग आला नाही. हे या प्रगल्भ भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे असो व्यवस्था बदलायला वेळ लागतो आणि आमच्या लेखणीमध्ये तेवढी ताकत अद्याप आलेली नसेल म्हणून मागील 30 वर्षापासून मेहनत करून सुध्दा मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही. आजच्या परिस्थितीत नांदेड लोकसभा मतदार संघातील अनेक युवक-युवती, त्यांचे आई-वडील दुसऱ्या लोकसभा मतदार संघात राहतात. परंतू त्यांचे नाव अजूनही त्यांनी बदलून घेतलेले नाही ही भारताची शिकलेली पिढी.सर्वसामान्य माणुस सरकारने आमच्यासाठी काय केले, खासदारांनी काय केले, आमदारांनी काय केले अशा प्रश्नांमध्ये गुंतलेला असतो. पण आपल्याला असलेल्या अधिकाराचा आपण किती आणि कसा उपयोग केला. यावर बोलायला कोणीच तयार नसते. भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत तर आमच्यावर काही कर्तव्यपण सुनिश्चित केलेली आहेत. त्या कर्तव्यांकडे मात्र आम्ही डोळे झाक करतो.
लोकशाही प्रगल्भ व्हावी, मतदान प्रक्रियेत सुव्यवस्था राहावी म्हणून शासनाने बरेच उपाय केलेले आहेत. मुळ निवडणुक निर्णय अधिकाऱ्यासह इतर अनेक निवडणुक निरिक्षक नेमले जातात. पण त्यांची संबंधीत लोकसभा मतदार संघामध्ये ओळखच नसते. त्यामुळे स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांना जे दाखवतील तोच आरसा दिसतो. त्यामुळे त्यांना सुध्दा लोकशाहीला सुदृढ करणारे निर्णय घेण्यात यश येत नाही. आजच्या परिस्थितीत बुथ जिंकणे हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. त्यामध्ये काम करणाऱ्यांना काय-काय दिले जात आहे , त्याच्या नोंदी खर्चात आहेत काय? याचा काहीच हिशोब ठेवता येत नाही. सोबतच एका व्यक्तीवर दहा लोकांची जबाबदारी दिली जाते. त्याला आधार मोदकांचा असतो मोदकांचा हिशोब निवडणुक खर्चामध्ये कसा घेतला जाईल याची काहीही सुव्यवस्था उपलब्ध नाही. एखाद्या जागी उमेदवाराने मिटींग घेतली तर त्या मिटींगमध्ये येणाऱ्या लोकांना सुध्दा मोदके वाटली जातात आणि बोलवणारा सुध्दा मोदक घेणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे असतो. त्या मिटींगमध्ये आलेल्या लोकांच्या भरवशावर मतदान मिळते का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
काही जातीय व्यवस्थांच्या अनुसार अमुक जात अमुक पक्षाला मतदान देणार नाही हे उमेदवारांना माहित असते. अशा परिस्थितीत त्या जातीच्या आवडत्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा अशी चर्चा पसरविली जाते. कारण त्यामुळे मुळ प्रतिस्पर्ध्याचे मतदान कमी व्हावे आणि आपल्या विजय निश्चित व्हावा हा त्या मागचा हेतू असतो असो असे म्हणतात प्रेम आणि युध्दा सर्व काही चालते. निवडणुक सुध्दा एक युध्दच आहे. जिंको कोणीही तो आपल्यासाठी काही करेल या अपेक्षेपेक्षा आपल्या लोकसभा मतदार संघासाठी लोकसभेत भांडेल याचा विचार जरूर करा. कारण एखादे बाळ रडल्यानंतरच ज्या प्रमाणे आई दुध पाजते. त्याचप्रमाणे संसदेमध्ये 500 पेक्षा जास्त लोकसभा सदस्य आहेत आणि तेथे मागून काही मिळेलच असे नसते त्यासाठी आटा-पिटा करावाच लागेल आणि आटा-पिटा करणारा उमेदवार निवडुण द्यावा एवढ्यासाठीच आम्ही ही मेहनत घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *