बनावट सुर्य छाप तोटा बनविण्याचा कारखाना पोलीसांनी पकडला ; एकाला पोलीस कोठडी तीन फरार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बनावट तंबाखु आणि त्याचे साहित्य असा 19 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या अखत्यारीतील विशेष पथकाने 29 मार्च रोजी शहरातील देगलूर नाका जवळील मिलतनगर येथे एम.जी.आर.गार्डनजवळ बनावट प्रकारचा व्ही.एच.पटेल कंपनी चाळीसगाव या बनावट सुर्य छाप तोटा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे धाड टाकली. तेथे तंबाखु भरण्यासाठीच्या पुंगळ्या, सुर्यछाप जर्दाच्या बावट आकृत्या, सुर्यछाप तोटा पॅकिंग करण्याचे कागद असे अनेक साहित्य मिळाले. सुर्यछाप कंपनीचा बनावट लोगो सुध्दा त्यात होता. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 19 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख सुलेमान उर्फ साहिल शेख वहिद (24), शेख गौस उर्फ गयासोद्दीन शेख इब्राहिम, शेख असलम शेख गयासोद्दीन आणि वसीम या चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 468, 471, 34 नुसार गुन्हा क्रमांक 258/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार राजू घुगे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजेंद्र सिटीकर आदींचे कौतुक केले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला शेख सुलेमान उर्फ साहिल यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *