
शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून निसर्ग व मानवसेवेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरजू व्यक्तींना मदत, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम तसेच पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची दखल घेत सुजय प्रतिष्ठानने या कार्याचा सन्मान केला.यावेळी शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांना विशेष गौरविण्यात आले. तसेच परिवाराचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव, IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य (सेवानिवृत्त) यांच्यासह विजय ठूबे, डॉ. सुरेश राठोड, उमाकांत बिराजदार आणि मधुकर चौधरी यांना सेवा रत्न व समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज भोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ, शिवकुमार साळुंखे, अपर आयुक्त, कस्टम्स विभाग, भारत सरकार, सुप्रसिद्ध उद्योगपती रामदास माने, किशनराव भोसले, निलेश निकम तसेच पुणे महापालिका सभागृह नेते आणि सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे शांतीदूत परिवाराच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली. समाजसेवा, मानवता आणि निसर्ग संवर्धनाची सांगड घालत समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा झालेला हा सन्मान प्रेरणादायी ठरला.
