देशभक्तांच्या छाताडावर ‘देशद्रोहाचे’ खिळे!

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करण्यात आल्या. त्यातून इंग्रजांनी आपले हेतू साध्य केले. एखाद्याची बदनामी करणे, त्याची ‘चरित्रहत्या’ करणे, ही गोष्ट जणू सामान्य बाब झाली होती. आजही काहीशा पद्धतीने, “देशद्रोह” सारख्या गंभीर कायद्याचा वापर स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केला जात आहे. याच संदर्भात सोनम वांगचूक यांची अटक एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.सोनम वांगचूक हे केवळ लडाखमधील नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि विदेशातही अत्यंत आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा आदर्श व्यक्तीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करणे हे अतिशय धक्कादायक आहे. त्यांच्या अटकेचा संदर्भ 17 सप्टेंबरच्या उपोषणानंतरचा आहे. त्यांनी त्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या मागण्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती.

 

सोनम वांगचूक यांनी त्यांच्या आंदोलनात स्पष्ट सांगितले होते की, “जेव्हा हिंसा झाली, तेव्हा मी माझे उपोषण मागे घेतले. कारण हिंसा ही चुकीची आहे.” त्यांनी शांततेच्या मार्गाने लढा दिला. पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि कदाचित त्यांच्या आंदोलनामुळे सरकार अडचणीत येऊ शकते, ही भीती असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सोनम वांगचूक यांनी एक अभियंता, वास्तुविशारद, पर्यावरणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून विविध क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी आपल्या संशोधनातून कमावलेली अब्जावधींची रक्कम लडाखमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. इतकी मोठी रक्कम असूनही, त्यांच्या नावावर स्वतःचे घरही नाही. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील पात्र त्यांच्या जीवनावर आधारित होते. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांना “जीनियस” अशी उपाधी दिली होती.

 

लडाखमधील हजारो युवक आज सोनम वांगचूक यांच्या मागे उभे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली “जैन जी गट” काम करत आहे. हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. लडाखमध्ये एका उद्योगपतीला मोठ्या भूखंडाचा अधिकार मिळावा, यासाठी हा सारा खेळ रचला जात आहे, अशी शंका उपस्थित होते. ही जागा हस्तांतरित करणे सुलभ व्हावे, म्हणून लडाखला अजूनही सहाव्या अनुसूचित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला नाही, आणि पूर्ण राज्याचा दर्जा देखील नाकारण्यात आलेला आहे.जर लडाखमध्ये विधानसभा अस्तित्वात आली, तर कोणत्याही उद्योगपतीला तिथे प्रकल्प सुरु करण्याआधी स्थानिक सरकारची परवानगी लागेल. म्हणूनच असे वाटते की, हा अडथळा दूर करण्यासाठीच सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे.

 

लडाखचे पोलीस महासंचालक सांगतात की, सोनम वांगचूक यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली होती, आणि पाकिस्तानी दैनिकात त्यांचा उल्लेख झाला होता. पण केवळ याच आधारावर त्यांना देशद्रोही ठरवता येईल का?जेव्हा चीनने अतिक्रमण केले होते, तेव्हा स्वतःच्या हाती तिरंगा घेऊन जो पहिला माणूस समोर गेला, तो सोनम वांगचूकच होता. त्यांनी सेनेला विविध मार्गांनी मदत केली आहे. हे सगळे गृहित धरले तरीही त्यांना देशद्रोही ठरवणे हा गंभीर प्रकार आहे.त्यांच्या पत्नीने देखील स्पष्ट सांगितले की, पोलिसांनी त्यांच्या घरी झडती घेतली, पण पुरस्कारांची ट्रॉफीशिवाय काहीच सापडले नाही. त्यांच्या कामातून, संशोधनातून आणि समाजसेवेतून त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत, त्याच आधारावर त्यांना देशद्रोही ठरवले गेले.या सर्व प्रकरणात एक प्रश्न उभा राहतो — जर सोनम वांगचूक यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले असते, तर हे आरोप हिंसेनंतरच का लावण्यात आले? पोलिसांना हे आधी का जाणवले नाही?तसेच, जर सोनम वांगचूक यांना अटक होऊ शकते, तर मग भारत सरकारने बांगलादेशातून निष्कासित झालेल्या शेख हसीना यांना संरक्षण का दिले? तो शरणागतीचा प्रकार कोणत्या व्याख्येत बसतो?

 

सोनम वांगचूक हे रस्त्यावरचे गुंड नाहीत. ते अत्यंत सुशिक्षित, विचारशील, कर्तृत्ववान आणि देशभक्त आहेत. विदेशातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवणे म्हणजे भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे.त्यांची अटक ही केवळ वैचारिक दडपशाही नाही, तर एक नियोजित राजकीय खेळी आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेत आहे. अनेक विदेशी वर्तमानपत्रांनी त्यांच्या अटकेची निंदा केली आहे.आजची परिस्थिती सांगते की, ही केवळ सोनम वांगचूक यांची लढाई नाही, तर ही संपूर्ण लडाख, तिथल्या लोकांच्या अधिकारांची, पर्यावरणाची, शिक्षणाची आणि सत्तेच्या चुकीच्या वापराविरुद्धची लढाई आहे. सरकार बदलल्याशिवाय या स्थितीत बदल होईल असे दिसत नाही.

 

निष्कर्ष:

सोनम वांगचूक यांच्यावर झालेली कारवाई ही केवळ एक व्यक्तीवरची नाही, तर संपूर्ण लोकशाही, पर्यावरणविचार आणि युवकशक्तीवरचा आघात आहे. आपण या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा ठेवूया.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!