स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

नांदेड (जिमाका) –  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले पात्र विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरणाचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह ऑनलाइन सादर करावा. अर्जाची सद्यस्थितीदेखील याच संकेतस्थळावर तपासता येणार आहे. आजअखेर नूतनीकरणाचे अत्यल्प अर्ज प्राप्त झाले असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीचा लाभ घेऊन तत्काळ अर्ज सादर करावा. दि. १५ सप्टेंबर २०२६ नंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर संदेश पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!