यश गुप्ताच्या मृत्यूचा जबाबदार कोण? जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि महानगरपालिकेच्या वातानुकूलीत कक्षात बसून तुम्ही सर्वसामान्यांचे जिव वाचवू शकत नाहीत जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब. काल श्रीनगरमध्ये घडलेल्या झाड पडून आई-वडील जखमी आणि मुलाचा मृत्यू याची जबाबदारी तुमचीच आहे.
पावसाळा येत असतांना बऱ्याच घटनांचे लक्ष ठेवणे प्रशासनाचे काम आहे. फक्त वीज पडतांना काय करावे आणि काय करू नये अशा प्रसिध्दी पत्रकांना प्रसारीत करून प्रशासन आपली जबादारी पार पाडल्याचे दाखवत असते. पावसाळ्याअगोदर वीज वितरणच्या तारा दुरूस्त होणे, झाडांच्या फांद्या कापणे, नाल्या सफाई करणे यापैकी यंदा कोणतेही काम झाले नाही याचे अनेक फटके नागरीकांन सोसावे लागले. पिण्याचे पाणी तर तीन दिवसाला एकदा, कोठे-कोठे आठ दिवसाला एकदा, कोठे-कोठे महिन्याला एकदा पुरविले गेले. पण पाण्याच्या पुरवठ्याची रक्कम मात्र मालमत्ता धारकांकडून पुर्णपणे वसुल करून घेण्यात आली. वातानुकूलीत कक्षात बसून फक्त गप्पा मारल्याने(मिटींगा), प्रसिध्दी पत्रके प्रसारित करून आपली जबाबदारी पुर्ण झाली असे म्हणता येत नाही.


काल रविवारी श्रीनगर भागात पंकज गुप्ता, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा यश हे तिघे डीमार्टकडून परत येत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयासमोर वाकलेेेले एक झाड त्यांच्या दुचाकीवर पडले. आई-वडील आणि मुलगा तिघे झाडाखाली अडकले. जनतेने खुप मोठा हातभार यामध्ये लावला. त्यात पोलीस अधिक्षकांचे गाडीचे चालक मनोज घेवारे आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील संतोष किल्लेदार यांच्यासह ऍटो चालक अंकुश औसेकर यांनी आणि संपुर्ण नागरीकांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतू झाडाच्या वजनामुळे ते शक्य झाले नाही, अखेर अग्नीशमन दलाचे पथक आले आणि त्यांनी कटरच्या सहाय्याने झाडे कापून जखमींना रुग्णालयात पाठविले. पण या दुर्घटनेत पंकज गुप्ता यांच्या पायाला फॅक्चर झाले आहे. आई गंभीर जखमी आहे आणि मुलगा यश मरण पावला आहे. कोण आहे या दुर्घटनेचा जबाबदार?
शहरभर महानगरपालिकेची मंडळी कार्यरत आहे. त्यांची काहीच जबाबदारी नाही काय? दोन वर्षापुर्वी वजिराबाद भागात सुध्दा पावसाळ्याच्या सुमारास आपल्या व्यापारी संकुलाला दर्शनी भागात अडथळा आणणाऱ्या एका लिंबाच्या झाडाची कत्तल करण्यात आली होती. त्या संदर्भाने काही जणांनी अर्ज पण केला होता. पण त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. सुदैवाने त्या प्रसंगी जिवीत हानी झाली नव्हती. यंदाच्या पावसाळ्यात न्यायासमोरच्या रस्त्यावरील एक झाड पडले पण त्यातही जिवीत हानी झाली नाही. न्यायालयासमोरचे झाड पडल्यानंतर तरी संबंधीतांना असलेल्या बुध्दीला चालना मिळणे आवश्यक होते. त्या चालनेवर शहरातील झाडांची पाहणी करून काय करणे आवश्यक आहे याचा बोध घेतला असता तर यशचा जिव गेला नसता.
शहरात सुरू असणाऱ्या बांधकामांना दिलेल्या परवानग्या सुध्दा महानगरपालिका तपासत नाही. अनेकांनी आपल्या मिळालेल्या परवानगीपेक्षा वेगळेच बांधकाम केलेले आहे. काही जणांच्या पायऱ्या पादचारी रस्त्यांवर आल्या आहेत. इथपर्यंत ठिक आहे. परंतू पंकज गुप्ताचा मुलगा यश गुप्ता याच्या मृत्यूची जबाबदारी मात्र निश्तिच व्हायला हवी. जनतेने सुध्दा या घटनेला एक दुर्घटना न बघता याचा जबाबदार कोण याचा पाठपुरावा करायला हवा तरच प्रशासन योग्यरितीने काम करेल. अनेकवेळा विचार केला जातो कोणाच्या पोटावर पाय देण्याचा आपला अधिकार नाही. परंतू यश गुप्ताच्या मृत्यूचा अधिकार कोणाला कोणी दिला होता. योग्यवेळी झाडांची दखल घेतली असती तर नक्कीच यशचा मृत्यू झाला नसता. म्हणून यशच्या मृत्यूसाठी जनतेने पेटून उठायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!