शांतता समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन डिजे वापरण्यास मनाई व अनाधिकृत होर्डीग लावता येणार नाही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन नांदेड – एप्रिल व मे महिन्यात हिंदू, मुस्लिम, शिख, बौध्द, जैन व अन्य सर्व धर्मियांचे उत्सव येत आहेत. नांदेड जिल्हा सर्वधर्म समुदायाच्या सण उत्सवाचे केंद्र आहे. सोबतच २६ एप्रिलला मतदान होणार आहे. अशा वेळी दुस-यांच्या धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कर्तव्य निभावत आपण परस्पराच्या सण उत्सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ते जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कीर्तीका सी.एम , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह विविध विभाग प्रमुख, पोलीस अधिकारी व विविध सामाजिक संघटना,संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. येणा-या दिवसात प्रत्येक आठवड्यात महत्वाचे सण, उत्सव आहेत. त्यातच 26 एप्रिलला लोकसभेचे मतदान आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेचे पालन करताना सण, उत्सव मर्यादेत साजरे करावेत. 24 ते 27 एप्रिल या कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. रस्त्यांवर अन्नदान करताना ताजे अन्न देण्यात यावे. शांतता समितीच्या विविध धर्मीय सदस्यांनी सूचविल्याप्रमाणे प्रशासन या काळामध्ये डिजे वापरायला पायबंद घातला आहे. तसेच निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत होर्डीग लावले जाणार नाही, आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी. यासंदर्भात कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी संबोधित केले. दुस-यांचे सण उत्सव साजरा होतो म्हणून नाराज होणारे अशा काळात घातक ठरतात. प्रत्येकाला आपआपल्या धर्म पंथानुसार सण उत्सव साजरे करण्याची मुभा घटनेने दिली आहे. त्यामुळे सर्वाच्या आनंदात सहभागी होणे एखादी घटना घडली तर जमाव जमवून कायदा हातात घेण्यापेक्षा पोलीसांची मदत घ्या. संयम ठेवा. अफवा पसरु देऊ नका,रस्त्यांवर अन्नछत्र, पाणी वाटप वाहतुकीला अडथळा होईल, असे उघडू नका, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच या काळात आदर्श आचारसंहिता सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच तपासणी सुरु राहिल. पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिईओ मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी देखील संबोधित केले. प्रशासनातर्फे यावेळी पुढील 14 एप्रिलपर्यत शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, उत्सवाच्या काळात 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत असेल, अन्न व औषधी प्रशासनामार्फत ठिकठिकाणी होणा-या अन्नछत्र व भंडारा मध्ये ताजे अन्न देण्यासाठी संबंधिताना निर्देशित करण्यात येईल. पाणी पुरवठा सुरळीत राहील. तसेच मिरवणूक रस्त्यांची स्वच्छता, फिरते शौचालय, रस्त्यावरील झाडाची कटाई याकडे लक्ष देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक समुदायातील मान्यवरांनी शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या व विविध सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. या महिन्यातील सण – उत्सव ९ एप्रिल : गुढीपाडवा, ११ एप्रिल : रमजाण ईद, १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १४ एप्रिल : बैसाखी, १७ एप्रिल : रामनवमी, २१ एप्रिल : महावीर जयंती, २६ एप्रिल : लोकसभा मतदान Kanthak Suryatal Post Views: 1,347 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकसभेसाठी अर्ज परत घेण्याची सोमवारी शेवटची तारीख पतीच्या अपघातानंतर पत्नीने घेतला गळफास