सोनखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात कुठेही जुगार चालत नाही, असा आव आणला जातो. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांकडून ‘सर्व काही नियंत्रणात आहे’ असे रंगीबेरंगी चित्र रंगवले जाते. मात्र प्रत्यक्ष वास्तव वेगळेच आहे. नांदेड ते उस्माननगर रस्त्यावरील शेवटचा जुगार अड्डा आता थेट गावाच्या आसपास—किवळा गावाजवळ हलवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या जुगार अड्ड्याच्या चालकाने प्रभू श्रीराम आणि संत श्री साईबाबा यांच्या नावांचा वापर करून स्वतःची ओळख तयार केली आहे. धार्मिक नावांचा आधार घेऊन बिनधास्तपणे बेकायदेशीर जुगार चालवला जातो, ही बाबच संतापजनक आहे. याहून गंभीर बाब म्हणजे या अड्ड्यात एक वर्दीधारी आणि एक बंदूकधारी व्यक्ती भागीदार असल्याचे बोलले जाते. बंदूक हातात असलेल्याला कायद्याची भीती कशी वाटणार? जुगार अड्डा सुरू आहे, सुरूच राहणार—कारण त्याला रोखणारा कोणीच नाही. आणि ज्यांनी परवानगी दिली असेल, ते तर त्याचे पाठीराखेच असणार, हे वेगळे सांगायची गरज नाही. मग अशा परिस्थितीत “नांदेड जिल्ह्यात जुगार चालत नाही” असे छातीठोकपणे कसे म्हणता येते? जिल्ह्यातील सर्व ‘नंबर दोन’ची कामे बंद असल्याचा कांगावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र सर्व खुलेआम सुरू आहे, तर काही निवडक ठिकाणी ५२ पत्त्यांचा जुगार देखील सर्रास चालतो. हा जुगार आजचा नाही—त्याचा इतिहास मोठा आहे. पूर्वी ‘सोगट्या’ होत्या, आता पत्ते झाले आहेत. मात्र खेळ तोच आहे—लाखो रुपयांची उलाढाल. भोकर गावातील काही वर्षांपूर्वीच्या छाप्याची आठवण आजही लोकांना आहे—जिथे नियमच असा होता की खिशात पाच लाख रुपये असतील तरच जुगार अड्ड्यात प्रवेश. म्हणजेच जुगार बंद नाही, तर नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. कारण जुगारामुळे अनेकांचा उदरनिर्वाह होतो, काही कुटुंबे त्यावरच जगतात आणि ‘आज हरलो, उद्या जिंकू’ या आशेवर पुन्हा पैसे ओतले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड–उस्माननगर रस्त्यावरील जुगार अड्डा आता थेट किवळा गावाच्या आसपास हलवण्यात आला आहे. या अड्ड्याच्या मालकाच्या नावात प्रभू श्रीरामचंद्र आणि संत श्री साईबाबा यांची जोड आहे—आणि अशा नावांच्या आडून जुगार चालवणे म्हणजे निर्ढावलेपणाची परिसीमा. याच अड्ड्यात वर्दीतील पिस्तूलधारी व्यक्ती भागीदार असल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल, तर त्या अड्ड्याला कुठलीच भीती उरत नाही. ज्यांच्याकडून परवानगी घेतली गेली आहे, ते अधिकारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरतात—सगळे दिसते, पण दाखवले जाते तेवढेच. जे दाखवले जात नाही, तेच खरे सत्य असते. जिल्हाभर फिरणारे अनेक अधिकारी प्रत्यक्षात दुसऱ्याच विभागात कार्यरत असतानाही येथेच ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. त्या मुख्य कार्यालयातही वर्षानुवर्षे खुर्च्या न बदलणारे चेहरे दिसतात. बदली कुणाचीच होत नाही—पण जुगार मात्र गावाजवळ सर्रास सुरू आहे. “नांदेड जिल्ह्यात जुगार नाही” हा केवळ देखावा आहे. वास्तवात जुगार उघड्यावर सुरू आहे—आणि हे सत्य बदलायला कोणीही तयार नाही, असे ठामपणे सूत्रांनी सांगितले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,176 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद मुदखेड आणि नांदेड ग्रामीण पोलीसांची वाळू माफियांविरुध्द कार्यवाही