ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

बाप-लेकाच्या भांडणात सोडविणार्‍याचा गेला बळी

किनवट, (प्रतिनिधी)- बाप-लेकातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुर्‍याने भोसकून गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रामनगरलागतच्या नालागड्डा भागात आज शनिवारी (दि.०६) दुपारी एकच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहरातील रामनगर नालागड्डा भागात राहणार्‍या तोडसाम कुटुंबातील दिलीप तोडसाम व त्यांचा मुलगा तिरुपती तोडसाम या बाप-लेकामध्ये आज शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास भांडण सुरु होते. हे भांडण सुरु असताना शेजारी राहाणारा भारत रामकिशन डोईफोडे हा विवाहीत तरुण त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व दोघांनाही समजावून सांगण्यासाठी गेला असताना “तू आमच्या घरच्या भांडणात कशाला पडतोस?” म्हणून तिरुपती दिलीप तोडसाम या तरुणाने रागाच्या भरात वाद मिटविण्यासाठी आलेल्या भारत रामकिशन डोईफोडे या तरुणाला आपल्या जवळील सुर्‍याने नाकावर जबर वार केल्याने गंभीर दुखापत झाली. जखमीस तातडीने गोकुंदा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मयत भारत डोईफोडे याची पत्नी शुभांगिनी भारत डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत भारत यास तीन मुली असल्याचे समजते. हल्ला केलेला आरोपी तिरूपती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारधर्म म्हणून माणुसकी दाखवण्यास गेलेल्या एका तरुणास नाहक प्राण गमवावे लागल्यामुळे या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *