नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागाने आज नांदेड शहरातून इतवारा ते भाग्यनगर दरम्यान रुटमार्च करून सन-उत्सवांमध्ये गोंधळ घालण्याचा विचार असणाऱ्यांना चांगलीच समज दिली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अशांतता निर्माण करणाऱ्यांसाठी आम्ही सदा तत्पर आहोत असा संदेश देण्यासाठीच हा रुट मार्च काढण्यात आला होता.
देशात उद्या दि.10 मार्च रोजी रामनवमी हा सण साजरा होणार आहे. असंख्य रामभक्त आप-आपल्या परीने या उत्सवात सहभागी होतात. नांदेड शहरात रामनवमी संदर्भाने शोभा यात्रा निघते. ही शोभा यात्रा रेणुकामाता मंदिर ते अशोकनगर हनुमान मंदिर अशी जात असते. या मिरवणूकीमुळे अनेक मार्ग बंद केले जातात. कांही पर्यायी मार्ग सुचवले जातात. पण मिरवणूकीतील मोठा जनसमुदाय लक्षात घेतला तर या मिरवणूकीदरम्यान कोणी समाज कंटक अशांतता निर्माण करण्याची शक्यता असते. याच दृष्टीकोणातून अशी अशांतता निर्माण करणाऱ्यांना समज द्यावी म्हणूनच पोलीस विभागाने आज रुट मार्चचे आयोजन केले होते.
अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, जगदीश भंडरवार, डॉ.नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरुध्द काकडे यांच्यासह अनेक सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, क्युआरटी पथकाचे जवान, महिला व पुरूष पोलीस अंमलदार तथा गृहरक्षक दलाचे जवान या रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. हा रुटमार्च इतवारा येथून सुरू झाला आणि पोलीस ठाणे भाग्यनगर येथे समाप्त झाला.
अनेक जागी सीसीटीव्ही कॅमेरे
रामनवमीसणानिमित्त निघणाऱ्या मिरवणूकीच्या संदर्भाने प्रशासनाने दक्षता घेत इतवारा ते अशोकनगर या भागात अनेक ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. यात शिवाजीनगर ते आयटीआय परिसरात कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाजीनगर येथे एका ठिकाणी जवळपास 500 फुटाच्या रस्त्यावर किल्ला तयार करण्यात आलेला आहे.