

नायगांव (प्रतिनिधी)- मित्रासोबत विहीरीत पोहायला गेलेल्या साईनाथ भिमराव ईंगळे या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. 12 ऑक्टोबर रोजी घडली. पण विहीरीत पाणी जास्त असल्याने मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे नांदेड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला बोलावण्यात आले. या पथकाच्या प्रयत्नामुळे सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मृतदेह हाती लागला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
साईनाथ इंगळे हा मंगळवारी दुपारी आपल्या काही मित्रासह लालवंडी रोडवर कॅंनालच्या बाजूला असलेल्या धनंजय चव्हाण यांच्या विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. शाळेचे दप्तर सोबतच होते आणि खिचडी, जिलेबी खावून पोहण्यासाठी गेले. साईनाथ पोहणे शिकत असल्याने हवेची ट्युब लावून पाण्यात उतरला पण ट्युब निसटल्याने तो पाण्यात बुडत होता. सोबतच्या मित्रानी वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश येत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेतातील नागरिकांचा धावा केला. आजूबाजूचे नागरिक येईपर्यंत साईनाथ विहीरीच्या पाण्यात बुडाला त्यामुळे सोबतच्या मित्रांनी घाबरून पळ काढला.
ही माहिती धनंजय चव्हाण यांना समजली त्यांनी व श्रीनिवास चव्हाण यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना कळवली. शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बाचावार व फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली पण त्यांनाही काही करता आले नाही. नायब तहसीलदार संजय देवराये, मंडळ अधिकारी दत्तात्रय धर्मापुरीकर, तलाठी बालाजी राठोड, यांनी काही पोहणाऱ्यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या साईनाथचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाही यश आले नाही शेवटी नांदेड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला बोलावण्यात आले.
या पथकाने तब्बल दोन तास विहीरीत शोध मोहीम राबवली सायंकाळी 6.30 वाजता मृतदेह हाती लागला. मृतदेह हाती लागताच उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. मृतदेह बाहेर काढल्यावर शवविच्छेदन करण्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.शवविच्छेदनांतर रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.