नांदेड(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीने केलेल्या बंदला नांदेड जिल्ह्यात तुरळक प्रतिसाद मिळाला. सर्व दुकाने कार्यकर्ते जाईपर्यंतच बंद राहिली. त्यामुळे हा बंद यशस्वी होता असे म्हणता येणार नाही.
आज महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. त्यात उत्तर प्रदेशमधील लखीमपुरच्या घटनेचा विरोधात हा बंद आहे असे सांगण्यात आले होते. आज सकाळी कांही कार्यकर्त्यांनी दुचाकींवर फिरून बंद करण्याचे आवाहन केले. कांही ठिकाणी शिवसेनेने निदर्शने केली. कॉंग्रेसने सुध्दा कांही ठिकाणी निदर्शने केली. त्यावेळी एका मोर्चाच्या स्वरुपात सर्व जण जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि तेथे निवेदन देण्यात आले.
या बंदमध्ये कॉंगे्रसचे आ.अमरनाथ राजूरकर, डी.पी.सावंत, विजय येवनकर, हरिहरराव भोसीकर, हणमंतराव बेटमोगरेकर, आ.बालाजी कल्याणकर, जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, सुमिती व्याहाळकर, संदीप सोनकांबळे, दत्ता कोकाटे, उमेश मुंडे आदींनी अनेक कार्यकर्त्यांसोबत घोषणा बाजी करत लखीमपूर घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले.
लखीमपूर घटनेबद्दल एका पत्रकार परिषदेत बोलतांना स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी सांगितले की, लखीमपूर घटनेतील आरोपींना कालच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या बंदला कांही महत्वच उरले नाही. आजच्या बंदमधून स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना तटस्थ आहे.