नांदेड

आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ठरतेय नवसंजीवनी

नांदेड(प्रतिनिधी)- आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने १५ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पंधरवडा साजरा करण्यात येत असून २३ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्यमान भारत दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्यमान भारत दिवसाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व रुग्णांना मिठाईचे डब्बे, फळे, तसेच माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले व इतर संलग्नीकृत रुग्णालयात आरोग्यमित्रांनी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड चे वाटप तसेच माहिती पुस्तिका वाटप करून साजरा केला आहे. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा व अंमलबजावणी साहाय्य संस्थेचे ( एम. डि. इंडिया टीपीए) विभागीय प्रमुख शरद पवार, विभागीय दक्षता अधिकारी बाबासाहेब लोखंडे, जिल्हाप्रमुख स्वप्नील देशमुख, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, डॉ प्रेमकिशोर वाळवंटे, पर्यवेक्षक अब्दुल रौफ, प्रियांका अहिरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
   
     आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात राबविण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना  व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना महाराष्ट्रात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित रित्या राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा ५ लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्ष घेता येणार आहे. या साठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अन्यथा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.
        या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत  उपचार असून त्या मध्ये १०३८ उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच १७१ उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. या मध्ये प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ नांदेड जिल्यातील जवळपास १,२२,०८३ कुटुंबांना होणार असून नांदेड मध्ये  आज पर्यंत २६,८५३ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.
          या योजनेचा लाभ घेण्या करिता आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे, ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबमध्ये आहेत त्यांना हे आयुष्यमान कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात मोफत तसेच आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर येथे बनवून दिले जाते, या करिता सर्व लाभार्थ्यांनी मूळ शिधा पत्रिका व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासन मान्य मूळ ओळख पत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा कॉमन सर्विस सेंटर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा यांनी केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *