कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण नियंत्रण कक्षात
नांदेड(प्रतिनिधी)- कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांची कारर्किद त्यांच्या विहीत वेळेपेक्षा 90 दिवस अगोदर संपली. तो कार्यकाळ संपण्यासाठी कोणा-कोणाला गुडघे रगडावे लागले हेही महत्वपूर्ण आहे. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी करीम खान पठाण यांच्यावरील भविष्यात येणारे संकट ओळखून त्यांना आपल्यासोबत नांदेड येथे बोलावून घेतले आहे. या सर्व घटनाक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार नेमण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले तर ही समस्या येणारच नाही. पठाण यांना कुंटूर येथून बोलाविण्यात आले आहे, पण त्यांच्या जागी तीन अक्षरी आडनावाचाच सहायक पोलीस निरीक्षक जाण्यासाठी आपले गाठोडे बांधून तयार आहे.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी 5 सप्टेंबर 2019 रोजी करीम खान पठाण यांची नियुक्ती झाली. पोलीस खात्यात घेतलेल्या प्रशिक्षणाचा पूर्ण उपयोग करत त्यांनी आपले कर्तव्य निभावताना इतर कोणाच्याही दबावात बळी पडणार नाही, कायद्याने दिलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करत गरजवंताला न्याय मिळेल अशा भुमिकेतून कामकाज सुरू ठेवले. असे सांगतात तो एखाद्या खोलीत बसलेला व्यक्ती असतो त्याला काय अडचण येणार. रस्त्यावर चालताना येणाऱ्या अडचणी भरपूर असतात. तेव्हा काम करताना त्याठिकाणी राजकीय लोकांनी करीम खान पठाण यांना समोर करून आपली पोळी त्या चुलीवर भाजून घेण्याची सुरूवात केली. अनेक तक्रारी केल्या पण पठाण यांनी केलेली सर्व कामे कायद्याच्या कक्षेतीलच होतील म्हणून त्यांच्यावर कोणताही आळ सिद्ध करता आला नाही.
नायगावचे आ. राजेश पवार यांनी वर्षभरापुर्वी विधानसभेत दिलेले आपले भाषण व्हॉट्सऍप आणि फेसबुक या संकेतस्थळांवर व्हायरल करून दाखविलेले कल्पकता अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक पोलीस सुरक्षा रक्षक हवा म्हणून चाललेला खेळ लांबलचक चालवला. त्यात तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्यावतीने काही राजे हरिशचंद्र मैदानात उतरले. पण कोणत्याही प्रश्नाचा निकाल लागण्याअगोदर त्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली. अनेक ठिकाणी जुगार सुरू आहेत. असे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. पण ते कोणत्या ठिकाणचे आहेत, त्यात दिसणारे व्यक्ती कोण आहेत याचा काही एक उलगडा त्या व्हिडीओमधून होत नव्हता. एकूणच पठाणविरूद्ध रचलेले खलबत दि. 21 जून 2021च्या रात्री पुर्णत्वाला आले आणि पठाण यांनी कुंटूरचा कार्यभार सोडून नांदेडच्या नियंत्रण कक्षात आपली हजेरी लावली. जिंकले काय राजेश पवार ? या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार नाही त्यासाठी काही काळ जावा लागेल.
पोलीस उपनिरीक्षक असताना नांदेड जिल्हा त्यानंतर बदलीवर परभणी जिल्हा आणि सहायक पोलीस निरीक्षकाची पदोन्नती घेऊन नांदेडला पुन्हा आलेल्या एका तीन अक्षरी आडनावाच्या सहायक पोलीस निरीक्षकाने कुंटूरला जाण्यासाठी आपले गाठोडे बांधूनच ठेवलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक करतात. काही ठिकाणच्या पदांसाठी त्यांना पोलीस उपमहानिरीक्षकांच्या परवानगी घ्यावी लागते, मग नवीन आलेले सहायक पोलीस निरीक्षक आदेश निघण्याअगोरच कसे तयार झाले यामागे कोणाचे खलबत आहे, कोण त्याला पाठबळ देत आहे हेच कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्याचा पोलीस गाडा चालत आहे.
खरे तर करीम खान पठाण यांच्यावर येणारा भविष्यातील धोका लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांना आपल्याजवळ नियंत्रण कक्षात बोलावून घेतले आहे. पुढे त्यांना काय मिळणार किंवा काय मिळणार नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. पण आपल्या मजबूत छत्राखाली प्रमोदकुमार शेवाळे यांनी करीम खान पठाणला दिलेला आसरा नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा. एक विचारवंत म्हणतो, वस्तूची किंमत त्या मिळण्याअगोदर असते आणि माणसांची किंमत त्याला गमावल्यानंतर कळते.
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या या पोलीस विभागात सुरू असलेल्या परिस्थितीचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी वाटते की, नाही तरी भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयातूनच होतात. तेव्हा त्यानंतर राज्यसेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना द्यावेत, जेणे करून महाराष्ट्रात सुराज्य चालेल. ज्याने त्याला जो अधिकारी हवा तो अधिकारी त्याने सांगितलेल्या जागी नियुक्त करता आणि आपल्या मर्जीची सर्व कामे ते करून घेतील आणि माझ्या आवडीचा अधिकारी नाही या प्रश्नाला कुठेच जागा मिळणार नाही. कोणतीच समस्या होणार नाही आणि नेत्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या मतदार संघातील कामे चालतील. सहायक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांनी, “आपली धुप मे कुछ जल, हर साये के साथ न ढल, गम की कोई आवाज नहीं, कागज काले करता चल’ या वाकप्रचाराप्रमाणे आपल्या जीवनाचे लक्ष ठरवावे अशी अपेक्षा आहे.
