रात्रीतून होणारी वाळू वाहतुक कोण थांबवणार ?
नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या समक्ष शहरातील गोदावरी नदी पात्रालगत गोवर्धनघाट परिसरात अवैध रेती उपसा करणारे अनेक तराफे आणि बोटी जाळण्यात आल्या. आज झालेली कार्यवाही छानच आहे. पण आजच रात्री रेतीची वाहतूक होणारच यावर निर्बंध काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास अचानकपणे जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार किरण अंबेेकर, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार अनेक पोलीस उपनिरिक्षक, असंख्य पोलीस कर्मचारी, आरसीपीचे पथक, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळाधिकारी जोनधले, अनिल धुळगंडे, तलाठी गाडे आदी गोवर्धन घाट परिसरात पोहचले. नदीतून या अधिकाऱ्यांसमक्ष अवैध वाळू काढण्याचे काम सुरू होते. अधिकाऱ्यांच्या एवढा मोठा ताफा पाहताच अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. कांही तराफे या अधिकाऱ्यांसमक्ष जाळ्यात आले आणि इतर तराफ्यांना नदी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा प्रकारे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर आज महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी केलेली कार्यवाही नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. पण आज रात्रीच अवैध वाळूचे ट्रक गावभर रेती पोहचवतात याचावर कोण लक्ष ठेवणार हा प्रश्न या कार्यवाहीनंतर सुध्दा उभा आहे.
