नंादेड(प्रतिनिधी)-देशातील कांही नेते, पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांचा खून करण्याचे खलबत रचणाऱ्या नांदेड येथील तीन जणांना एनआयए विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी.ई.कोठाळीकर यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील दोन जणांना न्यायालयाने पुराव्या अभावी मुक्त केले आहे.
सन 2012 मध्ये नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपअधिक्षक सुधाकर रेड्डी यांच्या तक्रारीनुसार मुंबई येथील काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2012 दाखल झाला होता. त्यामध्ये नांदेड येथून मोहम्मद अक्रम मोहम्मद अकबर बागवान रा.ईस्लामपूरा, मोहम्मद मुजमील अब्दुल गनी रा.ताजनगर नांदेड, मोहम्मद साजिद मोहम्मद फारुख रा.कुंभार टेकडी, मोहम्मद इरफान मोहम्मद गौस रा.इकबालनगर नांदेड, मोहम्मद ईलियास मोहम्मद अकबर रा.इस्लामपूरा नांदेड अशा पाच जणांना अटक झाली होती. या गुन्ह्यात दहशतवादी कृत्य करणे आणि हत्यार बाळगणे या संदर्भाची कलमे जोडण्यात आली होती. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास नांदेड दहशतवाद विरोधी पथकाचे सुधाकर रेड्डी आणि माणिक बेद्रे यांनी केला होता. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी पोलीस अंमलदार दिलीप जाधव यांनी पुर्ण केली होती.
पुढे हा गुन्हा राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे वर्ग झाला. त्या हा खटला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात चालला. या खटल्याचा निकाल देतांना विशेष न्यायाधीश डी.ई.कोठाळीकर यांनी या प्रकरणातील मोहम्मद अक्रम मोहम्मद अकबर बागवाल, मोहम्मद मुज्जमील अब्दुल गनी, मोहम्मद सादिक या तिघांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील मोहम्मद अकरम हा नोकरी करण्यासाठी सौदी अरबियाला गेला होता पण तेथे तो पाकिस्तान येथून चालविल्या जाणाऱ्या आतंकवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला आणि नांदेड, हैद्राबाद आणि बेंगलुरू येथील कांही हिंदु नेते, पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांचा खून करण्याचे खलबत रचले होते. पण नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना वेळीच अटक केली. आणि अनर्थ टळला. या प्रकरणातील मोहम्मद इरफान मोहम्मद गौस, मोहम्मद ईलीयास मोहम्मद अकबर या दोघांची न्यायालयाने पुराव्या अभावी सुटका केली आहे.
