नायगाव (प्रतिनिधी)-लोकसहभागातून केलेला पांदन रस्ता मांजरम ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांनी रोहयोतून केल्याचे दाखवून कुशल व अकुशल कामाचे ११ लाख रूपये उचलून घेतल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेल्या पत्रामुळे उघड झाला आहे. त्या पत्राने भ्रष्टाचाराचे बिंग फुटल्यामुळे मांजरम येथे खळबळ उडाली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दिगांबर निवृतीराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे केली आहे.
नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी म्हसोबा मंदिर ते गणपतराव बापुराव शिंदे यांचे शेतापर्यत पांदण रस्त्याचे काम शेतका-यांनी लोकसहभागातून केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी आडीच लाख रुपये खर्च केले होते. मात्र सध्या या पांदन रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने हा पांदन रस्ता करुन देण्याची मागणी होत होती. त्यातच जिल्हाधिकारी हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नायगाव येथे (ता.४)फेब्रुवारी २०२१ रोजी आले असता ग्रामस्थांनी एक निवेदन पांदन रस्त्याचे अपुर्ण काम पुर्ण करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.
मांजरमच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचे उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने (ता.२४) फेब्रुवारी २०२१ रोजी मिळाले. त्यात सदरील पांदन रस्त्याचे काम फिजिकली पुर्ण झाले असल्याचे नमूद करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांना धक्काच बसला. या पांदन रत्याचे काम फक्त अर्धवटमाती कामच झाले आहे. जवळपास पाच ते सहा वर्षापासून ते आज पावेतो रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पाच ते सहा वर्षापासून सदरील रस्त्याचे काम करण्यासाठी मुरुम व दगडाचे फक्त ढिगारे टाकुन ठेवलेले आहेत ते आजतागायत तेथेचे जागेवर आहेत. असे असतांना काम पुर्ण झालेच कसे असा प्रश्न पडला.
याबाबत दिगांबर शिंदे यांनी अधिकची चौकशी केली असता सदरचे काम ग्रामपंचायतने रोहयोतून केल्याचे उघड झाले. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी रोहयोतून काम केल्याचे दाखवून कुशल व अकुशल कामाचे खोटी देयके सादर करुन जवळपास ११ लाख रुपये उचलून घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दिगांबर निवृत्तीराव शिंदे, भीमराव राजाराम मलदोडे, सखाराम केशवराव शिंदे, रावसाहेब सटवाजी शिंदे, मोहन भाऊराव पेरके, दतात्रय शिवराम पेरके, व्यंकट गणेश पेरके, सुर्यकांत संभाजी मलदोडे, माधवराव व्यंकटराव शिंदे, श्याम व्यंकटराव शिंदे, अशोक गणपतराव शिंदे (बापूराव), गोविंद गणपतराव शिंदे यांच्यासह ३८ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सदर प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.